मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील महानगरपालिकेची सत्ता ही शिवसेनेकडेच राहणार असल्याचे निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई ही शिवसेनेचीच राहणार असल्याचे आज (गुरुवार) सांगितले. याचबरोबर, शिवसेनेचा तळपता सूर्य हा कधीच मावळणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रियाही राऊत यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केली.
227 जागा असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून या मोजणीमध्ये शिवसेनेने तब्बल 90 जागांवर आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) व शिवसेनेमधील संघर्षामुळे दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगपालिकेतील सत्तेचा राजदंड हा शिवसेनेकडेच राहणार असल्याचे राऊत यांनी यावेळी ठासून सांगितले. मुंबईमधील सत्ता कायम राखण्यात सेनेने मिळविलेले यश उल्लेखनीय मानले जात आहे.
शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे
|