पालिका शिक्षण विभागाचे ऑडिट करणार - आदित्य ठाकरे

पालिका शिक्षण विभागाचे ऑडिट करणार - आदित्य ठाकरे

मुंबई  - पालिकेच्या शिक्षण विभागाचे अत्याधुनिकरण करण्यासाठी लवकरच "नॅबिट' या थर्ड पार्टी संस्थेकडून ऑडिट करण्यात येणार आहे. एका महिन्यात त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. अहवालानंतर तातडीने या वर्षीपासूनच शिक्षण पद्धतीत आवश्‍यक सुधारणा आणि बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. पालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागासोबत बैठक घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

पालिकेच्या शिक्षण विभागात विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू गेल्या 10 वर्षांपासून मोफत दिल्या जात आहेत. तसेच बेस्टचा पास, नव्या शाळांची बांधणी व शाळांच्या दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. असे असले तरी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आणखी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण पद्धतीत काही बदल करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करून आवश्‍यक सुधारणा केली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यंदाचा पालिका शाळांचा दहावीचा घटलेला निकाल वाढवण्यासाठीही आवश्‍यक ते सर्व उपाय केले जाणार आहेत. त्यामध्ये आवश्‍यकता असल्यास विद्यार्थ्यांना जादा क्‍लास, शिक्षकांना अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पालिका शाळांमधील स्वच्छतागृह, कॅन्टीन स्वच्छ करण्यासाठी एनजीओ आणि एजन्सीची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक रुग्णालयांमध्ये दुरुस्ती काम सुरू असल्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करणे, पुरेसा औषध पुरवठा करणे यावर बैठकीत चर्चा झाल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या वेळी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, मंगेश सातमकर तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

निकाल का घटला? 
पालिकेच्या शाळांमध्ये तीन लाखांवर विद्यार्थी नऊ माध्यमांतून शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची डेंटल आणि मेंटल केअर घेतली जात आहे. तरीदेखील निकालाची घसरण का झाली, याचा शोध घेण्याची गरज आहे. शालेय गुण बंद झाल्यामुळे निकाल घटला असल्याचे दिसत असले तरी इतर कारणे शोधण्याचीही गरज आहे. त्यासाठी एनजीओ आणि सामाजिक संस्थांची मदत घेऊन उपाययोजना करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पालिका शाळांबाहेर प्रवेशासाठी रांगा लागल्या पाहिजेत, असे आपले स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पाणी तुंबणार नाही! 
विधानसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्‍न आदित्य ठाकरे यांना करण्यात आला असता ते म्हणाले, की सध्या दुष्काळ निवारण आणि पावसाच्या तयारीला प्राधान्य दिले जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या उपस्थितीत पावसाळापूर्व कामांच्या आढाव्याबाबत बैठक पार पडली आहे. पावसाळ्यासाठी पालिकेने उत्तम तयारी केली आहे. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोसारख्या अनेक विकासकामांमुळे पाणी साचण्याची शक्‍यता असली तरी पालिकेने आवश्‍यक त्या ठिकाणी पुरेशा पंपांची व्यवस्था केली असल्याचेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com