पक्षाच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष; युती न होणे दोन्ही पक्षांच्या फायद्याचे
मुंबई - मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणेच शिवसेना आणि भाजपला फायद्याचे ठरणार आहे. शिवसेनेला 105 ते 115 जागा मिळू शकतील. भाजपला 70 ते 80 जागांपर्यंत उडी मारता येईल, असा अंदाज शिवसेनेने केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. नोटाबंदीची नाराजी भाजपलाच भोवणार असून, खास करून गुजराती मतदार शिवसेनेकडे वळतील, असा निष्कर्षही काढण्यात आला आहे.
शिवसेनेने डिसेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात युती करणे दोन्ही पक्षांना तोट्याचे ठरेल, असे दिसून आले आहे. युती केली तर शिवसेनेला 85 आणि भाजपला 50 ते 55 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्वबळावर लढल्यास, शिवसेनेला 105 ते 115 आणि भाजपला 70 ते 80 जागा मिळतील, असा अंदाज आहे. नोटाबंदीचा फटका भाजपला या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बसेल. याच निर्णयामुळे भाजपचा पारंपरिक गुजराती मतदार शिवसेनेला मतदान करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे प्राबल्य असलेल्या प्रभागांतूनही शिवसेनेचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे; मात्र युती झाल्यास भाजपवरील नाराजीचा फायदा कॉंग्रेसला होईल. त्यामुळे युती न केलेलीच बरी, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
2012 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने 75 आणि भाजपने 32 जागा मिळवल्या. आता युती न केल्यास शिवसेनेच्या दहा जागा वाढतील. त्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये जास्त वाढ होईल. त्यामुळे युती न करणे शिवसेनेच्या फायद्याचे ठरणार आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे.
असा आहे अंदाज
युती न झाल्यास
पक्ष मिळणाऱ्या जागा
शिवसेना 105 ते 115
भाजप 60 ते 80
कॉंग्रेस 30 ते 40
राष्ट्रवादी कॉंग्रेस 10 पेक्षा कमी
एमआयएम 3 ते 5
युती करून भाजप 110 जागा लढल्यास
पक्ष मिळणाऱ्या जागा
शिवसेना 80 ते 90
भाजप 50 ते 60
कॉंग्रेस 40 ते 50
राष्ट्रवादी कॉंग्रेस 10 पेक्षा कमी
एमआयएम 3 ते 5
|