रुग्णांच्या दोन नातेवाईकांनाच प्रवेश
मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयांत राज्य सुरक्षा महामंडळाचे 700 सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. रुग्णांसोबत फक्त दोघा कुटुंबीयांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशिका नसतानाही आत आल्यास फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांतील "मास बंक'ची दखल घेऊन तोडगा काढण्यासाठी सोमवारी आयुक्त अजोय मेहता यांनी तातडीची बैठक घेतली. या वेळी पालिकेच्या सर्व रुग्णालयांत सशस्त्र सुरक्षा रक्षक ठेवण्याबरोबरच रुग्ण आणि नातेवाईकांसाठी प्रवेशिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नातेवाईकांना फक्त दोन प्रवेशिका दिल्या जातील. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे, उपायुक्त सुनील धामणे तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाते उपस्थित होते. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात येणार आहे.
पालिका रुग्णालयात "अलार्म'
निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी सोमवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचीही भेट घेतली. शनिवारपर्यंत 400 सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 1 एप्रिलपर्यंत 300 सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरवण्यात येतील, असे महापौरांनी सांगितले. पालिका रुग्णालयात "अलार्म' बसवण्यात येणार आहेत. एखादा अनुचित प्रकार घडल्यास अलार्मद्वारे सुरक्षा रक्षकांना तत्काळ बोलावता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
|