मुंबई - बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश (11) या वाघाला "रेबडोमायोचारकोमा' हा दुर्मीळ कर्करोगाचे निदान झाले आहे. गेल्या वर्षभरापासून यश आजारी होता. परंतु कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्याचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले आहे.
गेल्या वर्षभरापासून यशच्या तोंडाला गाठ येत असल्याचे उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. ही गाठ तातडीने शस्त्रक्रियेतून काढण्यात आली व तपासणीसाठी गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आली. या तपासणीचा अहवाल प्रलंबित असतानाच जुलै महिन्यात पुन्हा यशच्या तोंडाजवळ गाठ दिसून आली. तेव्हा यशला कर्करोग झाल्याचा संशय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आला. ही गाठही शस्त्रक्रियेतून काढून पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आली. यातील पहिल्या शस्त्रक्रियेतून काढलेल्या गाठीच्या नमुन्याचा अहवाल आठवड्याभरापूर्वी उद्यानाला मिळाला. त्यात यशला दुर्मीळ कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले.
पहिल्या शस्त्रक्रियेपूर्वी यशचे वजन 220 किलो होते. या शस्त्रक्रियेनंतर यशने खाणेही कमी केल्याने त्याचे वजन 70 किलोने कमी होऊन दीडशे किलोपर्यंत खाली उतरले आहे. यापूर्वी उद्यानातील "रॅबॅका' या पांढऱ्या वाघिणीचा त्वचा कर्करोगाने तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.
यशच्या कर्करोगाच्या खात्रीसाठी गाठीचे नमुने आम्ही वेगवेगळ्या पॅथॉलॉजी केंद्रात फेरतपासणीसाठी पाठवले आहेत. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
- अन्वर अहमद, मुख्य वनसंरक्षक, संजय गांधी उद्यान
गोरेगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या डॉ. आर. गायकवाड, डॉ. सी. वाकणकर यांच्या मदतीने यशवर उपचार करत आहोत. यशच्या उपचारासाठी इतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशीही बोलणी सुरू आहेत.
- डॉ. शैलेश पेठे, पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
रेबडोमायोचारकोमा कर्करोगाबाबत
स्नायूंसह हाडे तसेच स्नायूतंतूमध्येही हा कर्करोग आढळतो. म्हणूनच त्याला रेबडोमायोचारकोमा असे संबोधले जाते. प्राण्यांमध्ये हा कर्करोग आढळून आल्यास त्या भागावरील गाठ सातत्याने काढावी लागते. हा कर्करोग आढळून आल्यानंतर तीन ते चारच वर्षे प्राणी जगू शकतो, अशी माहिती गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
|