प्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचा कृती आराखडा!

प्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचा कृती आराखडा!
प्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचा कृती आराखडा!

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा कृती आराखडा अखेर नवी मुंबई महापालिकेने हरित लवादाकडे सादर केला आहे. त्यानुसार येत्या काही वर्षांत इलेक्‍ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याबरोबरच वाशी ते ऐरोली सागरी मार्ग उभारणी, रेल्वे स्थानकांपासून प्रवाशांची ने-आण करण्यासाठी बॅटरीवरील वाहनांचा वापर, बंदिस्त नाल्यांवर बहुमजली वाहनतळ अशा अनेक उपाययोजना करण्याचे पालिकेने निर्धारित केले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत (एनसीएपी) ३ वर्षांत ३५ टक्‍क्‍यांनी वायुप्रदूषण कमी करण्याचे ध्येय पालिकेमार्फत ठेवण्यात आले आहे. 

नवी मुंबईतील वायुप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नवी मुंबई महापालिकेला वायुप्रदूषण नियंत्रित करणारा सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. चालढकल करत का होईना अखेर हा आराखडा तयार झाला आहे. त्यात प्रदूषणाकरता विकासात्मक कामे व वाढती वाहनांची संख्या कारणीभूत असल्याचे पालिकेने नमूद केले आहे. यावर उपाय म्हणून येत्या तीन वर्षांत सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सुधारणे, इलेक्‍ट्रिक, बॅटरीवरील तसेच सीएनजी वाहनांना प्रोत्साहन देणे, बंदिस्त नाल्यांवर बहुमजली वाहनतळ उभारणे या प्रमुख उपाययोजना करण्यात येतील, असे पालिकेने सांगितले आहे. शहरातील विकासात्मक कामांमुळे हरित क्षेत्र कमी झाले असून, हरित क्षेत्र वाढवण्यासाठीही पालिका प्रयत्न करणार आहे. त्यादृष्टीने पावले उचलण्यासही सुरुवात करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.

जनजागृती करणार 
वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक महिन्याला आरटीओमार्फत टोल नाक्‍यावर पियूसी तपासणी, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये वायुप्रदूषण नियंत्रणाबाबत व्याख्यान, पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. जनजागृती करण्यास आरटीओने सुरुवात केली असून, पालिकेमार्फत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावरही भर दिला जाणार आहे. 

सार्वजनिक वाहतुकीवर भर 
नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याकरता जून २०२१ पर्यंत एनएमएमटीच्या ताफ्यातील बस संख्या वाढवण्याला प्राधान्य दिले जाईल. सध्या एनएमएमटीकडे ४७२ बस आहेत. त्यातील १५० सीएनजीवरील आहेत. २०२० पर्यंत बॅटरीवरील वाहनांना प्राधान्य प्रोत्साहन दिले जाईल. त्याकरीता चार्जिंग स्टेशन्स उभारले जातील. जून २०२२ पर्यंत ऐरोली ते वाशी व वाशी ते बेलापूर कोस्टल रोड पूर्ण करण्यात येईल.

वाहतूक कोंडी कमी करणार 
मुख्य रस्त्यावर तसेच अंतर्गत रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे जून २०२१ पर्यंत पालिका मोकळ्या जागा आणि बंदिस्त नाल्यांवर बहुमजली वाहनतळ उभारेल, असे पालिकेने म्हटले आहे. तसेच सर्व सार्वजनिक वाहनांसाठी बीएसव्हीआय इंधनाचा वापर जून २०२२ पर्यंत करण्यात येईल. आरटीओमार्फतही डिझेल वाहनांवर निर्बंध घालण्यात येतील. २०२० पर्यंत बीएसव्ही इंधन वापराला प्रोत्साहन दिले जाईल.

औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना इंधनात बदल करण्यास सांगण्यात आले आहे. तेथेही पीएनजी वापरास प्रोत्साहन दिले जाईल. आराखड्यात नमूद उपाययोजनांवर अंमलबजावणी सुरू झाली असून, आरटीओ, पालिका आणि शक्‍य तिथे सिडको प्रशासनाने एकत्रितपणे हे काम करायचे आहे.
- डॉ. अनंत हर्षवर्धन, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com