कळवा - कळव्यात उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद उफाळला असून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करून कळव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात शनिवारी जोरदार घोषणाबाजी केली. एका प्रभागात दोन एबी फार्म दिल्याचे उघड झाल्याच्या मुद्द्यावरून कळव्यात जितेंद्र आव्हाड विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीतून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटाने प्रभाग क्रमांक २४ मधून विटावा येथील जितेंद्र पाटील आणि प्रभाग क्रमांक २५ मधून खारीगाव येथील वर्षा मोरे यांची उमेदवारी पक्षश्रेष्ठींकडून मंजूर करून घेतली होती. त्याच जागांवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नगरसेवक अक्षय ठाकूर व नगरसेविका रिटा यादव यांनासुद्धा पक्षाचा एबी फार्म दिल्याचे उघड झाले. त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार नक्की कोण यावरून दोन दिवसांपासून कळव्यात प्रचंड संभ्रम निर्माण झाला. मोरे आणि पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांचे अधिकृत एबी फार्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले होते; तर इतर दोघांनी अर्जासोबत प्रदेशाध्यक्षांचे पत्र जोडले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रिटा यादव आणि जितेंद्र पाटील यांचे अर्ज बाद करत अक्षय ठाकूर आणि वर्षा मोरे हे पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्हावर लढू शकतील, असा निर्णय दिला. उमेदवारीचा मुद्दा संपुष्टात असला, तरी राष्ट्रवादीमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.