नगरसेवक-कंत्राटदार अभद्र युती? 

नगरसेवक-कंत्राटदार अभद्र युती? 

नवी मुंबई - शालेय वस्तूंऐवजी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर पैसे जमा होत असल्यामुळे लाखोंचा मलिदा हातातून निसटल्याने काही दुखावलेल्या कंत्राटदारांनी लोकप्रतिनिधींच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या पैशांत अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक अशोक गुरखे यांनी शालेय वस्तूंच्या वाटपात घोटाळा होत असल्याने ती तत्काळ थांबवावी, अशी मागणी केली. त्यावर सभापती शुभांगी पाटील यांनी शालेय साहित्यवाटपाचे पैसे थांबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय साहित्यासाठी दर वर्षी सुमारे 40 कोटींच्या कंत्राटांच्या निविदा निघत होत्या. अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे कंत्राट आपल्या पदरात पाडून घेण्याच्या मक्तेदारीचा पायंडाच काही कंत्राटदारांनी पाडला होता; मात्र यंदा राज्य सरकारने शालेय साहित्य वाटपात होणारा घोटाळा व वस्तूंचा घसरलेला दर्जा लक्षात घेऊन त्याचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यातील मलिदाबहाद्दर कंत्राटदार व लोकप्रतिनिधींना दणका बसला. राज्य सरकारचा निर्णय येईपर्यंत महापालिकेने साहित्यवाटपाची काढलेली निविदा पुन्हा रद्द केल्याने हातातोंडाशी आलेला घास गेल्याने कंत्राटदारांसह लोकप्रतिनिधीही संतापले. उशिरा का होईना महापालिकेतील एकूण 37 हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल 30 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढण्यात शिक्षण विभागाला यश आले. यातील बहुतेक शाळेतील विद्यार्थ्यांच्या खात्यावर बिले तपासून पैसे थेट जमा केले आहेत; मात्र यातही बिले खोटी आहेत. व्यवस्थित तपासलेली नाहीत. मिळालेल्या पैशांचा पालक दुसऱ्याच कामासाठी वापर करत आहेत, अशा प्रकारचे आरोप त्यांनी केले आहेत; परंतु याला भीक न घालता शिक्षण विभागाने त्यांचे काम पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून सर्व विद्यार्थ्यांची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली आहे. या वर्षाचेही पैसे तत्काळ मिळण्यासाठी पालकांना सूचना देण्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना कळवले आहे. 

खोटी बिले दिल्याचा आरोप 
शालेय वस्तू खरेदीची महापालिकेला सादर केलेली बिले खोटी असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक गुरखे यांनी स्थायी समितीकडे शिक्षण विभागातील कारभाराची माहिती सादर करण्याची मागणी केली. ती मिळेपर्यंत साहित्य वाटपाचे पैसे देण्याचे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार सभापती शुभांगी पाटील यांनी आठवडाभरासाठी शालेय वस्तूवाटप थांबवा, अशी सूचना प्रशासनाला केली; मात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर केव्हाच पैसे जमा झाल्याचे व आपण साहित्यवाटप करतच नाही, असे स्पष्टीकरण शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी दिले. त्यामुळे शालेय वस्तूंचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतच राहतील, असेही संगवे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com