मुंबई - आगामी काळात प्रत्येक भारतीयाने "नो मोअर पाकिस्तान' हीच भूमिका ठेवली पाहिजे. कूटनीतीचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरने घेतलेल्या "काश्मीर - पुढे काय?' या चर्चेत ते बोलत होते. या वेळी माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, माजी नौदल उपप्रमुख अभय कर्वे, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे सचिव विनायक काळे आदी उपस्थित होते. कूटनीती बोलून दाखवली जात नाही; आपले बुद्धिजीवी येथेच चुकतात. तशी चूक न करता कार्य केले पाहिजे, असे इंद्रेश कुमार म्हणाले. पाकिस्तानला अनेकदा समजावले; मात्र ते समजेल की नाही, हीच शंका आहे, असे ते म्हणाले.
केवळ शेख अब्दुल्ला यांच्या पंतप्रधानपदाच्या इच्छेपायी नेहरू यांनी काश्मीर प्रश्न चिघळत ठेवला. त्यामुळे स्वतंत्र भारतात दोन वर्षे दोन पंतप्रधान झाले, अशी टीका कर्वे यांनी केली. पाकिस्तानची सीमा 1971 नंतर पहिल्यांदाच फेब्रुवारी 2019 मध्ये भारताने ओलांडली आणि जगाला मोठा संकेत दिला. म्हणूनच आता सर्व पातळ्यांवर आपण एकत्रितपणे कार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले. कलम 370 आणि 35 (ए) तात्पुरती असल्यामुळे कधीही रद्द करता येऊ शकतील, असे मत ऍड्. एस. के. हलवासिया यांनी व्यक्त केले. ही दोन्ही कलमे घटनाबाह्य असल्यामुळे रद्द करावीत, असे कॅ. डी. के. सिंग म्हणाले.
|