तुर्भे - नवी मुंबईकरांना "ऑक्टोबर हिट'चा तडाखा जाणवायला लागला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून मंगळवारी (ता. 2) कमाल 36 अंश सेल्सिअस आणि किमान 25.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नागरिक ताप, अंगदुखीसारख्या विविध आजारांना बळी पडत आहेत.
शहरात गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होतोय असे वाटत असतानाच नवी मुंबईकरांना हवामानाने चकवा दिला. दोन दिवसांत आकाश निरभ्र झाले आणि आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. सकाळपासूनच ऊन जाणवत असल्याने नागरिक टोप्या, छत्र्या, गॉगल, स्कार्फ घेऊन बाहेर पडू लागलेत. उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना व्हायरल तापाचाही सामना करावा लागत आहे.
सध्या दुहेरी वातावरण अनुभवावयास मिळत आहे. सकाळी 10 नंतर असह्य उकाडा; तर संध्याकाळनंतर गारवा जाणवतो. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. यामुळे शहरात तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. शहरातील बहुतेक क्लिनिकमध्ये सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसत आहे. कणकण भरणे, सर्दी, खोकला, घसा दुखणे, हलका ताप, अंगदुखीचे रुग्ण वाढत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.