मुंबई, : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 नुसार मुंबई विद्यापीठाच्या प्रशासकीय रचनेत प्रथमच बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार काही विभाग नव्याने निर्माण होणार असून काही विभागांची नावे बदलण्यात येणार आहेत. या प्रस्तावित रचनेला विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने ही रचना अस्तित्वात येण्यापूर्वीच वादात अडकण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठातील प्रशासकीय रचनेत बदल करणे बंधनकारक आहे. त्यानुसार विद्यापीठाने परीक्षा विभागाचे नाव बदलून परीक्षा व मूल्यमापन मंडळ असे केले आहे. त्याचप्रमाणे नव्याने काही विभाग सुरू करण्याचे प्रयत्न विद्यापीठाने सुरू केले आहेत. याबाबत नुकतीच कुलगुरूंनी बैठक बोलावली होती. या बैठकीत नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या विभागांची माहिती देण्यात आली. त्याला काही अधिकाऱ्यांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कायद्यानुसार विद्यापीठात माहिती व तंत्रज्ञान विभाग निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यापीठात सध्या अस्तित्वात असलेले सायन्स ऍण्ड टेक्नोलॉजी विभाग त्यात सामावून घेतला जाणार आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित कामे या विभागात सामावून घेण्यात येणार आहेत. सध्याच्या थिसीस विभागाला रिसर्च डिपार्टमेंट नाव देण्यात येणार आहे. विदेशी विद्यार्थी, संशोधनाशी संबंधित कामे या विभागाच्या अंतर्गत आणण्यात येतील.
महाविद्यालय शिक्षक मान्यतेचा सेल आता महाविद्यालय विकास सेल असणार आहे. या सेलमार्फत विद्यापीठाचे नॅक, रॅंकिंग आदी कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सध्याचा आस्थापना विभाग यापुढे मानव संसाधन विकास म्हणून ओळखला जाणार आहे.
नव्याने निर्माण होणाऱ्या वैधानिक प्राधिकरण विभागामार्फत निवडणुका, सिनेट, व्यवस्थापन परिषद नेमणूक आदी कामे करण्यात येतील. नवीन विभागांच्या संचालकपदासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या विभागांमधील व्यक्तीचीच नेमणूक करण्यात येणार आहे. यासह अनेक मुद्द्यांवर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी या रचनेला विरोध दर्शवला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.