उल्हासनगर : डिसेंबर महिन्याच्या 30 तारखेला नाल्यात जिवंत फेकण्यात आलेल्या अवघ्या एक-दीड तासाच्या 'टायगर'वर उल्हासनगर ते मुंबई असा यशस्वी उपचार करण्यात आल्याने टायगरने मृत्यूची लढाई जिंकली आहे. येत्या काही दिवसात टायगरला वाडिया हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. कोणतेही रक्ताचे नाते नसताना टायगरचा संपूर्ण वैद्यकीय खर्च करून पालकाची भूमिका निभावणाऱ्या शिवाजी रगडे-जयश्री रगडे या दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.
काळ्या पिशवीत बांधून अवघ्या दिडतासाच्या अर्भकाला वडोळगावच्या नाल्यात फेकण्यात आले होते. वाचवण्यासाठी या अर्भकाने टाहो फोडल्यावर नागरिकांनी त्याला बाहेर काढले होते. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे-जयश्री रगडे या दाम्पत्याने त्याला प्रथम शासकीय रुग्णालयात दाखल केले. 9 दिवसानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला साई आशिष या खाजगी रुग्णालयात दाखल केले. न्यायालयाच्या परवानगीने त्याच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी रगडे दाम्पत्याने स्वीकारली. साई आशिष मध्ये अर्भकाने स्माईल दिल्यावर रगडे दाम्पत्याने त्याचे नाव टायगर ठेवले. मात्र टायगरच्या मेंदूत इन्फेक्शन झाल्याने त्याला मुंबई वाडिया हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रगडे दाम्पत्याला सहकार्य केल्याने टायगरला वाडियामध्ये दाखल केले. टायगरच्या मेंदूवरील पहिली शस्त्रक्रिया वाडिया हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाली. त्याच्या मेंदूत टॅबलेट ठेवण्यात आले. याच टॅबलेटने सकारात्मक असर दाखवल्यावर टायगर पूर्णपणे फिट झाला असून त्याला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. टायगरने मृत्यूची लढाई जिंकली आहे, अशी माहिती शिवाजी रगडे यांनी दिली.
टायगरला डिस्चार्ज मिळाल्यावर त्याला महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने कोणत्या बालगृहात ठेवावे, हा निर्णय अंबरनाथ पोलीस घेतील असेही रगडे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.