मुंबई : स्वातंत्र्य दिनाला काश्मीरमधील स्वायत्तता रद्द केल्याची पार्श्वभूमी असल्याने मुंबई पोलिस अलर्टवर आहेत. तब्बल 40 हजार पोलिस संपूर्ण शहरात बंदोबस्तासाठी असून, काही ठिकाणी अतिरिक्त कुमक पुरवण्यात आली आहे. तटरक्षक दलही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. साध्या वेशातील पोलिस मुंबईतील मोक्याची ठिकाणी फिरणार आहेत.
काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करण्यात आल्याच्या निर्णयाचे एका बाजूने स्वागत होत आहे; तर दुसऱ्या बाजूला त्याला विरोधही होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी घातपाताची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाची ठिकाणे, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे; तसेच सागरी किनाऱ्यांवरही विशेष सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच, तटरक्षक दलही अलर्टवर आहे.
मुस्लिमबहुल भागातील नागरिकांशी सतत संवाद सुरू असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच, निवासस्थाने, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस येथेही तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. शहरातील सीसी टीव्हीच्या माध्यमातून कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
|