डोंबिवली - पारधी समाजाची आव्हाने अद्याप काही मिटलेली नाहीत. भटक्या विमुक्तांचीच खूप मोठी समस्या आहे. लोकशाही व्यवस्था आपण स्विकारली असून मतांचा अधिकार आज प्रत्येकाला आहे. पण भटक्या विमुक्त जमातीत खूप मोठ्या लोकसंख्येला मतांचा अधिकार आजही नाही अशी खंत पद्मश्री पुरस्कार विजेते व पारधी समाजासाठी झटणारे गिरिश प्रभूणे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केली. श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली आणि प्र.के.अत्रे ग्रंथालय यांच्यावतीने डोंबिवलीतील वक्रतुंड सभागृह येथे पद्मश्री गिरिश प्रभूणे लिखित परिसाचा संग या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ खगोलतज्ञ दा.कृ. सोमण यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी पार पडले. यावेळी अलका मुतालिक, अश्विनी मयेकर, बळीराम गायकवाड, शिरिष आपटे, प्रवीण दुधे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी पद्मश्री प्रभूणे यांनी वरील खंत व्यक्त केली. पारधी समाजाविषयी ते म्हणाले, पारधी समाज, भटक्या विमुक्त जातीतील अनेकांना स्वतःचा कायमचा पत्ता नाही, आधारकार्ड नाही. जगण्याला योग्य ती साधनं लागतात जसे की नोकरी धंदा काम त्यांच्याकडे ते देखील नाही. मग नाईलाजाने त्यांना जगण्यासाठी चोऱ्या कराव्या लागतात. मग त्यातून पोलिस केस होते, कधी समाजाने हल्ला केल्याने, कधी पोलिसांच्या गोळीबारात मृत्यु होतो. आजही फारशी त्यांची परिस्थिती बदललेली नाही.यमगरवाडी आणि गुरुकूल ही पारधी समाजाचे दोन प्रकल्प, परंतू आज महाराष्ट्रात वीस एक ठिकाणी असे प्रकल्प सुरु आहेत. अशा प्रकल्पातून २५० - ३०० युवक नोकरीला लागले आहेत. काही इंजिनिअर देखील झाले आहेत. काही मुली ज्यांना घरदार नव्हते त्या ग्रुपने राहील्या वकील काही जण वकील, कार्यकर्ते झाले आहेत. समस्या आहेतच पण या समस्या सोडविण्यासाठी हातही या समाजातून पुढे आलेत ही मोठी बाब आहे असे ते म्हणाले.
पुस्तकाविषयी ते म्हणाले, परिसाचा संग हे पुस्तक यमगर वाडी, भटक्या विमुक्त समाजात काम करत असताना ज्या व्यक्तीरेखा, कार्यकर्ते, मार्गदर्शक असे अनेक जण भेटले. त्या प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य मला आढळलं माझ्या कामात त्यांचा सहभाग आहे. जसे समाजवादी विचारांचे देवदत्त दाभोळकर आहेत. डॉ. नरेंद्र जाधव आहेत खूप मोठं व्यक्तिमत्व पण अगदी सामान्य कार्यकर्त्यांसोबत बसून काम केले आहे. काही जण असे आहेत की त्यांच्या कामामुळे, विचारांमुळे, लेखणामुळे माझ्या जीवनात बदल झाला. अशी व्यक्तीरेखा ज्या लोकांना माहीत असतील परंतू त्यातील वेगळेपण मला दिसले व त्यामुळे माझ्यात खूप बदल झाला अशा व्यक्तीरेखा या पुस्तकात मी मांडल्या आहेत. प्रत्येक व्यकीकडून मला काही ना काही मिळत गेलं तो भाग या पुस्तकात आहे.
पद्मश्री प्रभूणे यांचे पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित होते, हे माझं भाग्य आहे. परिसाचा संघ हे पुस्तक त्यांनी लिहिले ते स्वतः एक परिस असून अनेक लोखंडांचे त्यांनी सोने केलं आहे. माणसाला माणसा सारखं जगण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करुन दिला आहे. हे मोठं काम असून अशी माणसं ऋषीमुनीसारखी समाजामध्ये आहेत. समाज बदलवणारी ही माणसं माणसाला माणसात आणतात हे विशेष. स्वतः परिसान 43 परिसांचा परिचय त्यांनी यात करुन दिला आहे. आजही समाजातील परिस्थिती ही निराशा जनक वाटते, हे पुस्तक वाचल्यानंतर समाज परिवर्तन करणारी माणसं या समाजामध्ये आहेत हे या पुस्तकाच्या माध्यमातून समोर येते अशा शब्दात खगोलतज्ञ दा. कृ. सोमण यांनी पुस्तकाचे आणि प्रभूणे यांचे वर्णन केले.
प्रभूणे यांच्या पुस्तकात सुभाष अवचट, कवी ग्रेस, गो.नी. दांडेकर, लता मंगेशकर, विनय सहस्त्रबुद्धे, नितीन गडकरी, विनोद तावडे, गोपीनाथ मुंडे, आर.आर.पाटील, बाबासाहेब पुरंदरे यांसह अनेक मान्यवर व्यक्तींशी त्यांची झालेली भेट, त्यांच्याकडून घेतलेले गुण त्यांनी पुस्तकात लिहिले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.