Vidhan Sabha 2019: मराठी टक्का निघाला गावाला!

voter
voter

विधानसभा 2019 :
मानखुर्द - मानखुर्द-शिवाजीनगर व अणुशक्तीनगर मतदारसंघातील दुबार मतदारांना (दोन ठिकाणी नावे असलेले) मतदानाच्या आधी पश्‍चिम महाराष्ट्रात नेण्यासाठी 530 गाड्यांची व्यवस्था झाल्याने मतदानातील मराठी टक्का घसरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दोन्ही मतदारसंघ मुस्लिमबहुल असल्याने मराठी मतदारांची मते एमआयएम, सप आदी पक्षांना मिळतच नाहीत. त्यामुळे अशा स्थलांतराला मुस्लिम उमेदवारांचा छुपा पाठिंबा असल्याचेही बोलले जाते. त्याचीच चर्चा सध्या राजकीय पक्ष कार्यकर्त्यांत रंगली आहे. 

सुट्टी साधून बाहेर जाणाऱ्या मतदारांमुळे मतदानाच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो. दिवाळीची सुट्टी आणि सोमवारी मतदान असल्यामुळे शनिवारी संध्याकाळीच मतदार गावी जाण्यासाठी निघतील. त्यासाठी लहान-मोठ्या अशा सुमारे 530 गाड्यांची व्यवस्था झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मानखुर्द-शिवाजीनगर आणि अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रामध्ये मराठी मतांचे प्रमाण सुमारे 30 टक्के आहे. त्यापैकी पाच टक्के मतदारांची नावे सातारा, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणच्या मतदार याद्यांमध्येदेखील आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी त्या भागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी किंवा मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदार गावाकडे जातात. त्यांच्या प्रवासाची व जेवणाची व्यवस्था उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून छुप्या पद्धतीने केली जाते. गावाकडे जाण्या-येण्याचा मोफत प्रवास, कुटुंबीयांची भेट तसेच छोटेखानी सहलीचा आनंद मिळत असल्यामुळे मतदार सहकुटुंब जातात. अशा मतदारांसाठी सुमारे 530 छोट्या-मोठ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शीव-पनवेल महामार्गावर महाराष्ट्र नगर जंक्‍शनजवळ अशा प्रवाशांची गर्दी निवडणुकीच्या आधीच्या संध्याकाळी उसळलेली दिसते. 

बऱ्याचदा असे ऐकण्यात येते की लोकसभा-विधानसभेच्या वेळी मतदार गावाकडे जाऊन मतदान करतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी ते मुंबईत मतदान करतात. आयोगाने मतदाराचे एकाच ठिकाणी नाव राहील यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 
- नवाब मलिक, राष्ट्रवादीचे अणुशक्ती नगरमधील उमेदवार 

प्रवाशांच्या नावात तफावत 
खासगी प्रवासी वाहनांकडून वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसते. अशा वाहनांतून प्रवास करण्यासाठी झालेल्या नावांची नोंदणी आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांत तफावत आढळते. निवडणूक काळात त्यामध्ये वाढ होते. प्रवासादरम्यान अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना त्याचा फटका बसून उपचार वा विम्याची रक्कम मिळवणे अवघड होऊ शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com