अभियांत्रिकी, एमबीएकडे विद्यार्थ्यांची पाठ; अभियांत्रिकीच्या 56 हजार जागा रिक्त
मुंबई - राज्यातील 347 अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेशप्रक्रिया पार पडल्यानंतर यंदाही तब्बल 56 हजार 406 जागा रिक्त राहिल्या आहेत. दुसरीकडे एमबीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमाच्याही 5 हजार 277 जागा रिकाम्या आहेत. या परिस्थितीत राज्यातील विद्यार्थ्यांनी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला यंदा सर्वाधिक पसंती दिल्याचे चित्र आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची मुदत शनिवारी संपली. संचालनालयाने पदवीच्या अभियांत्रिकी, (बीई, बीटेक) औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), एमबीए, एमएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची यादी तयार केली आहे. यामध्ये यंदाही सर्वाधिक जागा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिल्या आहेत. एमबीए अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थी पाठ फिरवू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षी अभियांत्रिकी आणि एमबीएच्या आणखी काही महाविद्यालयांना टाळे लागण्याची शक्यता आहे.
अभियांत्रिकीच्या 347 महाविद्यालयांत 1 लाख 30 हजार 356 जागा होत्या. यापैकी 73 हजार 950 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. औषधनिर्माणशास्त्रच्या 237 महाविद्यालयांत 17 हजार 188 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 16 हजार 873 जागांवर प्रवेश झाले असून, केवळ 315 जागा शिल्लक आहेत. वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या 84 महाविद्यालयांमध्ये 5 हजार 277 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 4 हजार 827 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, 450 जागा रिक्त आहेत.
राज्यातील रिक्त जागा
- अभियांत्रिकी : 43.27 टक्के
- एमबीए : 14.54 टक्के
- वास्तुशास्त्र : 8.53 टक्के
- औषधनिर्माणशास्त्र : 1.83 टक्के
बारावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही प्रवेशाची मुदत न्यायालयाकडून वाढवून घेतली. 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेल्या या मुदतीत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली.
- अभय वाघ, संचालक, उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय.
|