पोलिसदादाचे कुटुंब आजही असुरक्षित 

पोलिसदादाचे कुटुंब आजही असुरक्षित 

मुंबई - ऊन-पावसाची तमा न बाळगता मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचेच कुटुंब असुरक्षिततेच्या टांगत्या तलवारीखाली पोलिस वसाहतींमध्ये राहत आहेत. आपल्या बायका-मुलांना घरी ठेवून कर्तव्यासाठी ऑनड्युटी 24 तास रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसदादांना आपले कुटुंबीय घरी सुरक्षित असतील ना, अशी चिंता रोजच सतावत आहे. 

मुंबईत अनेक ठिकाणी पोलिसांच्या वसाहती आहेत; परंतु त्यांची पार दुरवस्था झाली असून, त्या धोकादायक ठरत आहेत. 

वरळीच्या बीडीडी चाळीतील पोलिस वसाहतीत गेल्या वर्षी छताचा काही भाग कोसळून एक महिला जखमी झाली होती. त्यानंतर वरळी पोलिस वसाहतीतील घरांची पाहणी करण्यात आली. तेव्हा घरांची अवस्था फारच बिकट असल्याचे आढळले आहे.

पावसाळ्यात गळणारी घरे आणि धोकादायक छतामुळे पोलिस कुटुंब जीव मुठीत धरून राहत आहेत.  पोलिस वसाहतींमधील घरांची दुरुस्ती करण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याने अशी परिस्थिती आली आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षे हीच अवस्था कायम असून, ती बदलण्याचा प्रयत्न कोणीही करीत नाही, असाही आरोप कुटुंबीयांकडून होतो. 

वरळीच्या घटनेत पोलिस पत्नी जखमी झाल्यानंतर पोलिसांच्या घरांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला. आजूबाजूला उच्चभ्रू वस्ती असलेली वरळी वसाहतही त्याला अपवाद नाही. वरळी पोलिस कॅम्प परिसरातील इमारतींचीही अशीच दुरवस्था झाली आहे. विशेष करून "जे' व "एच' इमारतींची अवस्था खूपच गंभीर आहे. 

अनेक इमारती सुमारे 50 वर्षे जुन्या आहेत. पूर्वीपेक्षा या वसाहतीतील घरांच्या स्थितीत बरीच सुधारणा झाली असली, तरीही अनेक घरांमध्ये पोलिस कुटुंबीय आजही जीव मुठीत घेऊन तेथे राहत आहेत. अनेक घरे धोकादायक ठरवून बंद ठेवण्यात आली आहेत. काही अपवाद वगळता मुंबईतील साऱ्याच पोलिस वसाहतींची दुरवस्था आहे. मात्र, त्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) भोंगळ कारभाराने त्याकडे लक्ष देण्यास कुणालाच वेळ उरलेला नाही. 

तक्रारी-अर्जांकडे दुर्लक्ष 
जुन्या इमारतींची वरवरची डागडुजी करून त्यात नव्याने दाखल होणाऱ्या पोलिसांना जागा दिली गेली. जुन्या इमारतींच्या भिंतींना तडे गेल्यामुळे दर वेळी प्लास्टर निघणे, स्लॅब कोसळणे आदी घटना वारंवार घडतात. विशेष करून, कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या घरांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. डागडुजीपेक्षा संरचनात्मक दुरुस्त्या कराव्यात, अशीही मागणी पोलिस कुटुंबीय करीत आहेत. एका घराच्या पाहणीत बाथरूमच्या वरच्या बाजूला मोठ्या भेगा पडलेल्या आढळल्या. तो भाग कधीही पडेल, अशी भीती कुटुंबीयांना आहे. रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या. दुरुस्तीसाठी अर्जही करण्यात आला होता. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याची खंत त्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

45 हजार पोलिसांना 20 हजार घरे 
मुंबईतील बऱ्याच पोलिस वसाहतींची दुरवस्था झाली आहे. सध्या मुंबई पोलिस दलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या 45 हजार इतकी आहे. त्या तुलनेत घरांची संख्या निम्मी म्हणजेच साधारणपणे 22 हजार 500 इतकीच आहे. त्यात माहुल येथील वसाहतीमध्ये तेथील समस्यांमुळे पोलिस जाण्यास तयार नाहीत. काही वसाहती जीर्ण झाल्या आहेत. काही इमारती धोकादायक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या सील केल्या आहेत. अशा कारणांमुळे वापरात नसलेली घरे कमी केली, तर फक्त 20 हजार घरे शिल्लक राहतात. 

शॉर्टसर्किटचा धोका 
इतर वसाहतींच्या तुलनेत वरळीतील पोचखनवाला मार्गावरील पोलिस वसाहतींची स्थिती तशी चांगली आहे. पण, तेथील अनेक घरांमध्ये निवृत्त झाल्यानंतरही पोलिसांची अनेक कुटुंबे राहत आहेत. मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माहीम परिसरात ही वसाहत आहे. तेथे 95 कुटुंबे राहतात; पण पावसाळ्यात येथील गळक्‍या छतांमुळे पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. एका घराच्या इलेक्‍ट्रिक बोर्डच्या वरूनच पाणी गळत असल्यामुळे शॉर्टसर्किटचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे जीव मुठीत धरून या कुटुंबाला राहावे लागत आहे. येथेही सीलिंगचा काही भाग धोकादायक असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस कुटुंबांमध्ये नाराजी आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. 

माहीम परिसरात अनेक झोपड्या होत्या. त्यांनाही पुनर्विकासाअंतर्गत चांगली घरे देण्यात आली आहेत. पण, पोलिस कर्मचाऱ्यांना घरासारखी मूलभूत सुविधाही व्यवस्थित उपलब्ध करून दिली जात नसल्याबद्दलही एका कुटुंबाने नाराजी व्यक्त केली. 

ताडदेव येथील पोलिस वसाहतीतील घराचा स्लॅब कोसळून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दोघे जखमी झाले होते. इमारत क्रमांक चारमधील रूम क्रमांक दोनमध्ये हा अपघात घडला. डिलाईल रोडच्या पोलिस वसाहतीतील शेवटचे मजले रिकामे झालेले आहेत. पावसाळ्यात पाणी गळत असल्यामुळे या जुन्या इमारतींमध्ये राहण्यासही कुटुंबे तयार होत नाहीत. काही अपवाद वगळता मुंबईतील साऱ्याच पोलिस वसाहतींची अशी दुरवस्था आहे. मात्र, त्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) भोंगळ कारभारामुळे त्याकडे लक्ष देण्यास कुणालाच वेळ उरलेला नाही. 

पोलिसांना मिळणार हक्काची घरे 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पोलिस गृहनिर्माण मंडळाची बैठक ऑगस्ट महिन्यात मंत्रालयात झाली होती. त्यात मुंबईतील बीडीडी चाळींत 30 वर्षांहून अधिक काळ राहत असलेल्या पोलिसांना तेथील घरे मालकी हक्काने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच, पोलिसांच्या मालकी हक्कांच्या घरांसाठी पनवेलमध्ये राज्य सरकारने जमीन दिली आहे. तेथे मालकी हक्काच्या घरांची योजना राबविली जात आहे. या पद्धतीने राज्यातील नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या शहरातही अशा पद्धतीने पोलिसांच्या घरांची योजना राबविण्यात येणार आहे. महसूल तसेच राज्य सरकारच्या अन्य विभागांकडून या शहरातील जमिनी घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी गृह विभागाने आराखडा तयार केला असून, या वर्षी म्हणजे 2019 मध्ये योजनेची सुरुवात केली जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण, घोषणेनंतर निवृत्त झाल्यानंतरही पोलिस घरे रिकामी करत नाहीत. सध्या 43 प्रकल्पांमध्ये 21 निवासी संकुलांचे 1696 कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे. अकोला, गोरेगाव, सातारा, जळगाव, मरोळ, मुलुंड, ठाणे, बीड, नांदेड, रायगड, मालेगाव, उस्मानाबाद आदी ठिकाणी निविदांचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com