भावी पोलिसांची जिद्द, भरतीप्रक्रियेत सोयीसुविधांचा अभाव
मुंबई - पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मुंबईतील उकाड्याने हैराण केले आहे. ऊन थकवत असले तरी नोकरी मिळविण्यासाठी धावण्याशिवाय पर्याय नाही, अशा भावना काही उमेदवारांनी व्यक्त केल्या.
राज्यभरातून आलेल्या उमेदवारांना येथे प्राथमिक सुविधाही दिलेल्या नाहीत. चांगल्या खाद्यपदार्थांची सोय नसल्याने फेरीवाल्यांकडील पदार्थ खावे लागतात. पिण्यासाठी शुद्ध पाणी व निवाऱ्याची पुरेशी सोय नाही. स्नानाचीही व्यवस्था या ठिकाणी नाही. तसेच शौचालयांची दुरवस्था आहे. अशा परिस्थितीत भरतीप्रक्रिया सुरू आहे.
सकाळी आणि दुपारी अशा दोन टप्प्यांत धावण्याची चाचणी घेण्यात येते. सकाळी 6 ते 10 तसेच दुपारी 3 नंतर, अशा दोन टप्प्यांत भरती चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यासाठी राज्यभरातून उमेदवार आले आहेत. उन्हाचा तडाखा बसत असल्याने चाचणीसाठी ऊर्जा टिकवून ठेवण्याचे आव्हान या उमेदवारांपुढे आहे. सरावादरम्यानही मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च होऊन थकवा जाणवतो, असे काही उमेदवारांनी सांगितले. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चांगली वागणूक आणि पुरेशा सोयीसुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा एका उमेदवाराने व्यक्त केली.
उशिराचे शहाणपण
मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी ते घाटकोपरदरम्यानच्या सर्व्हिस रोडवर सध्या पोलिस भरतीसाठी उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू आहे. धावण्याच्या चाचणीसाठी 1600 मीटरचा टप्पा ठेवण्यात आला आहे. याआधी पाच किलोमीटर पार करण्याची अट होती; पण पोलिस भरतीत काही तरुणांचे मृत्यू झाले आणि गृह विभागाला शहाणपण सुचले. आता हे अंतर कमी केले आहे.
|