राजकीय रणधुमाळीत बिर्याणीवाल्यांची चलती

राजकीय रणधुमाळीत बिर्याणीवाल्यांची चलती
राजकीय रणधुमाळीत बिर्याणीवाल्यांची चलती

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून विविध पक्षांच्या राजकीय जनसंपर्क कार्यालयांवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे; तर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना गळाला लावण्यास पदाधिकारीदेखील संपर्क साधत आहे. या राजकीय नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर येत असणाऱ्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी त्याला नाश्‍त्याच्या वेळी वडापाव, भजी, चहा, कॉफी देण्यात येत आहे; तर जेवणाच्या वेळेला व्हेज, नॉनव्हेज बिर्याणी देण्यात येत आहे. त्यामुळे बिर्याणीवाल्यांची चलती सुरू झाली असून, वडापाव, चहाविक्रेत्यांना देखील निवडणुकीमुळे सुगीचे दिवस आले आहेत.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सहा महिन्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे पालिका निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळावे, यासाठी मागील चार वर्षांपासून बंद असणारे माजी नगरसेवकांचे देखील जनसंपर्क कार्यालय सुरू झाले असून, कार्यकत्यांची गर्दी वाढवण्यासाठी; तसेच त्यांना खुश करण्यासाठी नाश्‍त्यापासून जेवणाचीदेखील व्यवस्था केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षांच्या नेत्याला निवडून आणण्यासाठी व आपल्या प्रभागातून जास्तीत जास्त मतदान मिळवून देत, स्वतःची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणले जात आहे. मात्र, या कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याचा खर्च हा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. चहाविक्रेत्याला देखील जसे कार्यकर्ते जनसंपर्क कार्यालयात येतात, त्या पद्धतीने चहा मागवला जात आहे. ऐरोलीतील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर दिवसाला २०० चहा जात असल्याचे चहाविक्रेत्याने सांगितले. बिर्याणीदेखील मागवली जात असून, सायंकाळी त्या सर्वांचे पैसे चुकते केले जातात.

चहाविक्रत्यांना सुगीचे दिवस
निवडणुकांमुळे राजकीय कार्यकर्त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेटणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात चहा मागवला जात आहे. बाहेरील लोकांना सहा रुपयांना चहा देण्यात येतो. मात्र, राजकीय नेत्यांकडून जास्त मागवण्यात येत असल्यामुळे त्यांच्याकडून पाच रुपये दराने पैसे घेतले जातात. त्यातच दोन कंटिंगमध्ये तीन करण्यास देखील नेते सांगतात. असे एका चहाविक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

वडापाव-भजीची चलती
राजकीय नेत्यांच्या कार्यालयाला सकाळ व संध्याकाळच्या वेळेला वडापाव; तसेच भजी मागवली जातात. जनसंपर्क कार्यायलयाबरोबरच निवडणूक कार्यालयातून देखील वडापाव मागवले जातात. १२ रुपयांना असणारा वडापाव हा राजकीय नेत्यांकडून १० रुपये दराने खरेदी केला जातो. सध्या कांद्याचे दर वाढल्यामुळे बटाटा भजी मागवण्यात येतात. संध्याकाळच्या वेळी बिलाची रोख रक्कम दिली जाते. दिवसाला २०० वडापाव हे राजकीय नेत्यांच्या कार्यालयात जात असून, निवडणूक प्रचार सुरू झाल्यांनतर मागणी आणखीनच वाढेल, असे वडापाव विक्रेते मधु पाटील यांनी सांगितले.

बिर्याणीच्या दरात वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बिर्याणीचे दर हे किलो मागे ५० ते ७० रुपयांनी वाढले आहेत. व्हेज बिर्याणी ४०० रुपये किलो, चिकण बिर्याणी ६०० रुपये किलो, मटण बिर्याणी ८०० रुपये किलोने विकली जात आहे. चिकनच्या दरात; तसेच भजीच्या दरात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत एका राजकीय नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून ६ ते ७ किलो बिर्याणी मागविण्यात येत आहे; मात्र प्रचाराचा काळ सुरू झाल्यांनतर यामध्ये आणखीनच वाढ होईल, असे बिर्याणी विक्रेते युसुब खान यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com