नवी मुंबईकरांचे छप्पर सलामत

नवी मुंबईकरांचे छप्पर सलामत

नवी मुंबई - शहरातील बहुसंख्य रहिवासी आणि वाणिज्य स्वरूपाच्या इमारतींवर उभारण्यात आलेल्या इमारतींवरील बेकायदा पत्र्याच्या शेड्‌सना महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. शहरातील शेकडो इमारतींना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पत्र्याच्या शेड्‌सची चटईक्षेत्रमुक्त परिसर म्हणून स्थान देत नियम शिथिल केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समजली आहे. मात्र त्याकरीता काही मीटर उंचीची अट घालण्यात आली आहे; परंतु हा विकास आराखडा जेव्हा सर्वसाधारण सभेत मंजूर होईल, तेव्हाच या नव्या तरतुदीचा नवी मुंबईकरांना लाभ मिळणार आहे. 

शहरातील रहिवासी आणि वाणिज्य इमारतींवर बेकायदा बसवण्यात आलेल्या पत्र्याच्या शेड्‌सचा मुद्दा अनेक वर्षे रखडलेला आहे. नवी मुंबईतील ३ लाख १० हजार मालमत्तांपैकी अंदाजे ८५ टक्के इमारतींवर पत्र्याच्या शेड्‌स उभाल्या आहेत.

टेरेसवरून होणारी पाण्याची गळती आणि इमारतींना गेलेल्या भेगांमध्ये मुरणारे पाणी त्यामुळे अनेकांच्या घरातील भिंतींमधून पाणी झिरपत आहे. इमारतींच्या भिंतीचे आयुर्मान वाढवण्यासाठी रहिवासी इमारतींवर पत्र्याच्या शेड्‌स उभारल्या गेल्या आहेत. यापासून इमारतींचे संरक्षण व्हावे, हाच हेतू आहे. मात्र अशा शेड्‌समुळे इमारतीचे आयुर्मान कमी होत असल्याचा निष्कर्ष नगररचना विभागाने काढला आहे. 

त्यामुळे शहरातील अशा इमारतींना फक्त पावसाळ्यापुरतीच नगररचना विभागातर्फे तात्पुरती शेड उभारण्याची परवानगी देण्यात येते होती. मात्र त्याचा गैरफायदा घेत बहुसंख्य इमारतींमधील पदाधिकाऱ्यांनी राजरोसपणे पत्र्याच्या शेड्‌स उभारल्या आहेत. अशा एक लाखापेक्षा जास्त इमारतींना पालिकेने पत्रे काढण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे त्या शेड्‌सवर कारवाईची टांगती तलवार होती. यातून दिलासा देण्यासाठी नव्या विकास आराखड्यातील नियमावलीत या पत्र्यांना चटईक्षेत्रमुक्त परिसर म्हणून नोंदवले जाणार आहे. फक्त त्याची उंचीवर मर्यादा घालण्यात आली आहे. टेरेसवरील साफ-सफाई व इमारतीच्या देखभालीकरिता याचा उपयोग करण्यासाठी दाखवले जाणार आहे; परंतु विकास आराखड्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाने केलेल्या तरतुदींचा फायदा होणार आहे. 

सिडकोकालीन इमारतींना सर्वाधिक फायदा  
सिडकोने उभारलेल्या ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीबीडी-बेलापूर या भागातील बहुसंख्य इमारतींवरील छत उघडे आहेत. या इमारतींचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्याने इमारतीच्या छतामधून पावसाचे पाणी झिरपून भिंती ओल्या होत आहेत. ओल्या भिंतींमुळे अनेक इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे इमारतींचा पावसाच्या पाण्यापासून बचाव होण्यासाठी छतावर पत्र्याच्या शेड लावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com