कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेल्या 27 गावांतील दस्त नोंदणी एक वर्ष उलटूनही बंद आहे. दस्त नोंदणी पुन्हा सुरू करावी, यासाठी सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे नुकतेच एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. या मागणीला पाठिंबा देत कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनीही याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे निवेदन दिले.
दस्तनोंदणी बंद असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. यामुळे स्थानिक भूमिपुत्र बांधकाम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नोंदणी बंद करण्याबाबत शासनाचा कोणताही लेखी आदेश नसताना नोंदणी बंद करण्यात आल्याने स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याची बाब आमदार भोईर यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिली.
महसूल खाते, नगरविकास खाते, सार्वजनिक बांधकाम खाते यांनाही संबंधित निवेदन देऊन दस्त नोंदणी सुरू करण्याची मागणी उचलून धरली आहे. नगरविकास तसेच इतर संबंधित विभागांमध्येही भोईर यांनी निवेदन देत या समस्येकडे लक्ष वेधले.
नगरविकास खात्याने त्यांच्या पत्राला उत्तर देत अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी व दस्त नोंदणीच्या सुलभतेसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने पाळावयाची नियमावली या पत्रात नमूद केली आहे. आगामी काळात दस्त नोंदणीच्या प्रश्नावरून ग्रामीण भागात मोठे घमासान होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.