मुंबई - रब्बी हंगाम 2018-19 साठी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील हवेली, दौड, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्यांसाठी रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
आज विधान भवनात खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कालवे सल्लागार समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, दौड, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्यांतील वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, असे आवाहन करताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याचे निर्देश या बैठकीत दिले. यंदा पाऊस कमी पडल्याने पुणे महापालिकेने काटकसरीने पाण्याचा वापर करावा, पाण्याची थकबाकी तत्काळ जलसंपदा विभागाकडे जमा करावी, यामुळे शेतकऱ्यांना मदत करता येईल, असे महाजन म्हणाले.
बैठकीत वादळी चर्चा
नीरा उजवा कालव्यातून पंढरपूरला पाणी सोडण्यावरून बैठकीत गणपतराव देशमुख, भारत भालके आणि हणमंत डोळस यांच्यात वाद झाला. गणपतराव देशमुख आणि भालके यांनी पंढरपूरला पाणी सोडण्याची मागणी केला असता, डोळस यांनी त्याला आक्षेप घेतला. पंढरपूरला आधीच पाणी सोडले असून, तुम्हाला आणखी पाणी कशासाठी, असा सवाल डोळस यांनी करताच देशमुख भडकल्याचे समजते. यावर विजय शिवतारे यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. नीरा डावा कालव्यातील आवर्तनासाठी दीड टीएमसी पाणी पुरेसे असते. यंदा अडीच टीएमसी पाणी सोडले तरी अनेक ठिकाणच्या तक्रारीत वाढ झाल्याचा मुद्या चर्चेत आला. यावर जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने पाण्याचे व्यवस्थापन बिघडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
|