चौकीदार चोरही नहीं; डरपोक भी है : राहुल गांधी

चौकीदार चोरही नहीं; डरपोक भी है : राहुल गांधी

मुंबई - भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी विरुद्ध कॉंग्रेस, अशी थेट लढाई सुरू झाली आहे. मोदी सरकारने फक्त फसव्या घोषणा करून देशवासीयांची दिशाभूल केली. शेतकरी आणि नागरिकांना काहीही मिळाले नाही; मात्र उद्योगपतींना कोट्यवधी रुपये देऊन त्यांची कर्जे माफ केली. भ्रष्टाचाराबाबत समोरासमोर चर्चा करण्याची मोदी यांची हिंमत नाही. "चौकीदार चोरही नहीं; डरपोक भी है', असा घणाघाती हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (ता. 1) वांद्रे-कुर्ला संकुलातील जाहीर सभेत चढवला. देशात आता कॉंग्रेसचीच सत्ता येणार, असा ठाम विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात शुक्रवारी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली. धुळ्यातील सभेनंतर त्यांचे सायंकाळी 6.30 वाजता आगमन झाले. सुरुवातीलाच पाकिस्तानने मुक्त केलेले हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे त्यांनी अभिनंदन केले. समोरच्या समुदायातून "चौकीदार चोर है' अशा घोषणा येत होत्या. त्या वेळी राहुल गांधी यांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 

राफेल प्रकरणात अनिल अंबानी यांना मोदींनी 35 कोटी की 45 कोटी दिले, असा सवाल त्यांनी केला. हे सरकार फक्त श्रीमंतांचे आहे. सरकारच्या फसव्या घोषणांना नागरिक कंटाळले असून, कॉंग्रेसच सत्तेवर येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. वस्तू आणि सेवा कराचा फायदा मोठ्या उद्योगपतींनाच झाला; सर्वसामान्यांचे मात्र हाल झाले, असे ते म्हणाले. 

संविधानिक संस्था, न्यायव्यवस्था यांच्या स्वायत्ततेवर सरकारने अतिक्रमण केले आहे. देशाची घटना बदलण्याचे प्रयत्न सुरू आहे; मात्र कॉंग्रेस घटनेचे संरक्षण करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या वेळी मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, संजय निरुपम, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड यांची भाषणे झाली. पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, सुशीलकुमार शिंदे, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त आदी उपस्थित होते. 

फसव्या घोषणांनी फसवणूक 
अनिल अंबानी, नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्‍सी यांची कोट्यवधी रुपयाची कर्जे माफ केली; मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंबीय, सामान्य नागरिक, व्यापारी, छोट्या व्यावसायिकांना काहीही मिळाले नाही. प्रत्येक नागरिकाच्या बॅंक खात्यात 17 हजार रुपये जमा करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या सरकारने फक्त साडेतीन रुपये टाकून त्यांच्या तोंडाला पाने पुसली. मोदी सरकारने फसव्या घोषणा करून त्यांची फसवणूक केली, असा हल्लाबोल राहुल यांनी केला. 

"मेड इन धारावी' 
मोदी सरकारने "मेक इन इंडिया' घोषणा केली; पण अजूनही प्रत्येक उत्पादनावर "मेड इन चायना' छाप आहे. कॉंग्रेसचे सरकार "मेक इन मुंबई', "मेड इन धारावी' असा ध्यास धरेल, असे सांगत त्यांनी मुंबईकरांची मने जिंकली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com