
Raigad News: शिक्षकांसाठी ग्रामस्थ एकवटले ; जिल्हा परिषदेने केलेली बदली रद्द करण्याची मागणी
महाड : अनेक गावांमध्ये शिक्षक काम करत नाहीत म्हणून त्यांची बदली करा, अशा तक्रारी पालक-विद्यार्थ्यांकडून करण्यात येतात. मात्र शिक्षक दाम्पत्याची बदली रद्द करावी, हेच शिक्षक आम्हाला पाहिजे, असा आग्रह महाड तालुक्यातील शिरवली येथील ग्रामस्थांनी धरला आहे. (Latest Marathi News)
शाळेतील मुलांची प्रगती आणि शिक्षकांची अध्यापनाची पद्धतीमुळे मुलांचा सर्वांगिण विकास होत असल्याने आमच्या मुलांकरिता हेच शिक्षक योग्य असल्याची ग्रामस्थांची मागणी आहे
शिरवली गावात जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे. कमी पटसंख्या, शिक्षकांची अपुरी संख्या अशा समस्या असतानाही उर्दू शाळा मात्र शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांसाठी आवडीची बनली आहे. अहमद बागवान आणि त्यांची पत्नी शिरीन हे दाम्पत्य दहा वर्षे उर्दू शाळेत अध्यापनाचे काम करत आहेत. (Marathi Tajya Batmya)
विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी मिळून मिसळून वागत त्यांच्या समस्या जाणून घेत, गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न केला जात आहे. यामुळे मुलांनाही हेच शिक्षक हवेहवेसे वाटू लागले.
नुकतीच त्यांची बदली झाली असून याबाबत ग्रामस्थांना कळतात, शिक्षकांची बदली न करता या ठिकाणी आणखी दोन शिक्षकांची नेमणूक करावी,
अशी मागणी होत आहे. शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून दोन शिक्षक आणि एक तात्पुरत्या स्वरूपात असे तीन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेची पटसंख्या ३६ असून फक्त तीन शिक्षक कार्यरत आहेत. ज्या शिक्षकांच्या बळावर विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात आहे, त्याचीच बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती पालकांना आहे.