रोह्यामध्‍ये सुपांच्‍या मागणीत वाढ

 सुप खरेदी करताना ग्राहक.
सुप खरेदी करताना ग्राहक.

रोहा : व्रतवैकल्यांचा श्रावण महिना सरून आता भाद्रपद महिना सुरू होण्याच्या बेतात आहे. वर्षा ऋतू संपून शरद ऋतू सुरू होत असताना गणेशासोबत गौरींचे आगमन जवळ आले आहे. त्यामुळे माहेरी येणाऱ्या गौरीला सुपातून वंसा देण्याची पद्धत असल्याने सुपांच्या मागणीत वाढ झाली आहे. बाजारात सूप खरेदीची लगबग दिसून येत आहे. यंदा सुपांच्या किमतीत 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. 

गणेशांचे आगमन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यापाठोपाठ गौरीचे आगमनही होत आहे. गौरीपूजनात वंसा पुजण्याचे महत्त्व असून त्यासाठी सुपांची आवश्‍यकता असते. 3 सूप, 6 सूप, 11 सूप व 21 सूप अशा प्रमाणात वंसा पुजला जातो. त्यासाठी लागणारे 16 बंधी सूप खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात वर्दळ असून सूप विक्रेतेही जागोजागी विक्री करताना दिसत आहेत.

सुपासोबत रवली, डाली, सुपली व भाकरीची टोपलीही विकली जात आहे. या वर्षी अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तयार मालाचे नुकसान झाले आहे. सुमारे 15 ते 20 टक्के सूप पावसात भिजल्याने खराब झाले. तसेच बांबूच्या किमती व वाहतूक खर्च वाढल्याने सुपांच्या किमतीला 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात.

गेल्या वर्षी सूप 90 ते 100 रुपयांना विकले गेले होते. ते या वर्षी 110 ते 130 रुपयांना विकले जात आहे. नारळी पौर्णिमेला सुरू झालेली सुपांची विक्री गौरी विसर्जनापर्यंत सुरू राहते. या काळात प्रत्येक विक्रेता साधारणपणे 4 हजार सुपांची विक्री करतो. सूप, टोपल्या बनवण्यासाठी तांदळा, दुलीप, माणगा आणि मेसी या प्रकारचे बांबू वापरले जातात. यात तांदळा प्रकारचा बांबू श्रेष्ठ मानला जातो. त्याची किंमत अधिक असते. 

चौकट 
व्यवसाय अडचणीत 
रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार ही ओळख हळूहळू पुसली जात असताना शेतीवर अवलंबून असलेले कित्येक गृहउद्योग नामशेष होत आहेत. त्यापैकीच एक कैकाडी अथवा बुरुड समाजाचा बांबूपासून सूप, टोपल्या बनवण्याचा व्यवसाय अडचणीत आला आहे. हा व्यवसाय आता फक्त प्रथा परंपरांना आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंपुरता टिकून राहिला आहे. पूर्वी निसण्या फूनण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या सुपांना आता मागणी नाही. शेणगोठा करण्यासाठी टोपलीऐवजी प्लास्टिकची घमेली वापरले जात आहेत. भाताची कणगी नामशेष झाली आहेत. त्यामुळे आता फक्त पूजा, लग्नविधी व कार्याला लागणारे साहित्य एवढ्याच मालाला मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. 

कोट 
गौरीपूजनात लागणाऱ्या सुपांची विक्री चांगली वाढली आहे. वाहतूक खर्च, बांबूच्या वाढलेल्या किमती व या वर्षी अतिवृष्टीमुळे तयार माल खराब झाल्याने किमती 15 ते 20 टक्के वाढल्या आहेत. 
- कमल माने, सूप विक्रेत्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com