उन्‍हाळी भातशेती संकटात

रोहा : धरणात मुबलक पाणीसाठा असल्‍याने भातशेतीसाठी लवकर पाणी सोडण्‍याची मागणी होत आहे.
रोहा : धरणात मुबलक पाणीसाठा असल्‍याने भातशेतीसाठी लवकर पाणी सोडण्‍याची मागणी होत आहे.

रोहा : रायगड जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० हजार हेक्‍टर उन्हाळी भातशेती होते. या वर्षी पावसाळा दीर्घकाळ राहिल्याने कालव्‍यामध्‍ये उशिरा पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे; मात्र भातशेती चांगली करता यावी, यासाठी वेळेत पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाणी उशिरा मिळाल्यास उन्हाळी भातशेतीचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.  

रायगड जिल्ह्यातील सुमारे ४० ते ५० हजार हेक्‍टर उन्हाळी भातशेती होते. दीर्घकाळ राहिलेल्या पावसाने या वर्षी जिल्ह्यातील पावसाळी भातशेतीचे मोठे नुकसान केले. जमिनीत अधिक ओलावा राहिल्याने रब्बी हंगामातील कडधान्य शेतीचेही नुकसान झाले. जमिनीत वाफे तयार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी कालव्‍याचे पाणी उशिरा सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. त्यामुळे उन्हाळी भातशेती पीक तयार होण्यास उशीर होईल व वळवाचा पाऊस पडल्यास पुन्हा भातशेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

कोलाड पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत सुमारे १४ धरणे आहेत. यात फणसाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, पाभरे, संदेरी, वरंध, खिडवाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले या धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणात मुबलक पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे. यंदा भातशेतीसाठी २० डिसेंबरपासून पाणी सोडण्यात येणार असल्‍याची माहिती देण्‍यात आली आहे. उशिरा पाणी सोडल्यास शेवटच्या भागातील शेती पिकावर या वर्षी पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता आहे.

कडधान्यांच्या नुकसानीची भीती
या वर्षी दीर्घकाळ पाऊस राहिल्याने शेतकऱ्यांनी कडधान्य लागवड उशिरा केली आहे. पाटाचे पाणी सोडल्यास कडधान्य पिकाचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. तसेच जमिनीत वाफे तयार होण्यास वेळ लागणार आहे. तसेच गाळ काढून कालव्यांची दुरुस्ती केल्यामुळे शेवटपर्यंत पाणी वेळेत पोहोचणार आहे. त्‍यामुळे २० डिसेंबरनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पावसाळा उशिरापर्यंत राहिल्याने शेतकऱ्यांनी कडधान्य लागवड उशिरा केली आहे. त्या पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी भातशेतीला २० डिसेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे. 
‘पी. सी. डाभीर, कार्यकारी अभियंता, कोलाड पाटबंधारे विभाग  

पाणी उशिरा सोडल्यास पिके उशिरा तयात होतील. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये पडणाऱ्या पावसाच्या तडाख्यात उन्हाळी पिकाचे नुकसान होऊ शकते. कालव्याला लवकर पाणी सोडले जावे.
- संजय पशीलकर, बळीराजा शेतकरी संघर्ष संघ, जिल्हा अध्यक्ष 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com