मुंबई ः रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. रखडलेला महामार्गाचा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय काढावा, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली.
रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाचे गेली अनेक वर्षे रखडले आहे. जंगल क्षेत्रामुळे अडकलेल्या पुणे-माणगाव महामार्ग, रायगड किल्ला, महाडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचेही काम प्रलंबित आहे. पेण-खोपोली, माणगाव-दिघी पोर्ट, इंदापूर-आगरदांडा, वाकण-पाली-खोपोली आणि शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली हे राष्ट्रीय महामार्गही जंगल क्षेत्र आणि जमीन संपादनाच्या कामामुळे रखडले असल्याकडे तटकरे यांनी लक्ष वेधले. यातून मार्ग काढण्यासाठी महसूल अधिकारी व वन खात्याच्या अधिकाऱ्यांची तुकडी नेमावी. डीपीआर समुपदेशकाकडून डीपीआर बनवून घेऊन मगच कामाला सुरुवात करावी, अशा सूचना तटकरे यांनी सभागृहात मांडल्या.
रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाचे काम प्रलंबित आहे. त्याचा केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पात समावेश करावा. त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही सभागृहात केली. मुंबई-गोवा महामार्गाबाबत सूचना मांडताना मार्गाचे चौपदरीकरणाचे काम 2012 पासून विविध कारणांमुळे रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेक अपघात होऊन नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. हा महामार्ग टोलमुक्त करण्याचाही प्रयत्न सरकारकडून केला जाणार होता. त्याबद्दलही संबंधित विभागाकडून या वेळी उत्तराची मागणी तटकरे यांनी केली.
|