रमेश हनुमंते यांचा पक्ष पदाचा राजीनामा 

रमेश हनुमंते यांचा पक्ष पदाचा राजीनामा 

कल्याण -  आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरू केली आहे. कल्याण पूर्वमध्ये 14 जानेवारी रोजी या संपर्क यात्रेमधील सभा पार पडली. या सभेसाठी पक्षाचे मातब्बर नेते उपस्थित होते. ज्या कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. अशा शहरात झालेल्या या सभेने नागरिकांमध्ये चर्चा होत असतानाच पक्षामध्ये असलेल्या बेबनावाचे चित्र समोर येत आहे. पक्षातील गटबाजीच्या राजकारणाचा फटका आपल्या कामाला तसेच पक्षाला बसत असल्याचे कारण देत कल्याण-डोंबिवली जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश हनुमंते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे हनुमंते यांनी हा राजीनामा सुपूर्द केला आहे.

2015 मध्ये हनुमंते यांना पक्षाने कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. या नियुक्तीला पक्षातील एका गटाचा विरोध होता. हनुमंते यांच्या कार्यात अडथळे निर्माण करण्यात हा गट कायमच सक्रिय राहिला. 2010 च्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 नगरसेवक निवडून आले होते. 2014 च्या मोदी लाटेनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीची धूळधाण उडाल्याचे पहायला मिळाले. 2015 च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवघ्या दोन उमेदवारांना  महापालिकेत स्थान मिळवता आले. 14 पैकी दहा नगरसेवकांनी तर पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. अशा परिस्थितीत पक्षवाढीसाठी काम करताना धनको नेतृत्वाचा त्रास झाला, असा आरोप हनुमंते यांनी आपल्या राजीनामापत्रात केला आहे. 2020 मधील पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी  म्हणून त्यांनी व्हिजन 2020 तयार केले होते. सेना-भाजपच्या पक्ष रचनेनुसार बुथ पातळीवरील कार्यकर्ते तयार करण्याचा प्रयत्न हनुमंते यांनी केला होता. यात त्यांना काही प्रमाणात यशही मिळाले होते. या माध्यमातून सुमारे दीड हजार कार्यकर्ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडले असल्याचा दावा केला. याच दीड हजार कार्यकर्त्यांच्या जोरावर निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेमध्ये गर्दी जमवणे शक्य झाल्याचेही हनुमंते यांनी म्हटले आहे. 

या निर्धार यात्रेतील आलेल्या कटू अनुभवानंतर हनुमंते यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम थांबवण्याचा निर्णय घेतला. ही सभा अयशस्वी व्हावी यासाठी पक्षाच्या जिल्ह्यातील नेतृत्वानेच अडथळे उभे केल्याचा गंभीर आरोप हनुमंते यांनी केला आहे. लोकनेते गणेश नाईक यांनी सभेच्या एक दिवस आधी सभास्थान बदलण्याचा आदेश दिला. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्याने हा आदेश आपल्याला पाळता आला नसल्याचे हनुमंते यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. बुथ पातळीवरील कामासाठी तयार केलेल्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने या सभेसाठी हनुमंते यांनी जवळपास 3000 ची संख्या जमवण्याचा प्रयत्न केला. जिल्हातील नेतृत्वही या सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करतील या आशेवर सभास्थानी 5000 खुर्च्या मांडण्यात आलेल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात असे काही घडलेच नाही. त्यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्या राहिल्या. या रिकाम्या खुर्च्यामुळे मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. या सर्व गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे हनुमंते यांनी पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांना कळवले आहे. आपल्या जागी पक्षाचे हित लक्षात घेऊन प्रामाणिक कार्यकर्ता नेमला जाईल अशी अपेक्षाही हनुमंते यांनी आपल्या राजीनामापत्रात व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com