रसायनी - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भोकरपाडा गावाजवळ टॅंकर उलटून सांडलेले रसायन ओढ्याच्या पाण्याद्वारे पाताळगंगा नदीत मिसळले आहे. या घातक रसायनाने ओढा व नदीतील मासे मोठ्या प्रमाणावर मृत पावल्याने एमआयडीसीच्या दोन जलशुद्धीकरण केंद्रांतून परिसराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
शनिवारी (ता. 21) दुपारी पनवेलहून दांडफाट्याकडे जाणारा हा रसायनांचा टॅंकर भोकरपाडा गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला ओढ्याजवळ उलटला होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. टॅंकरला गळती लागून त्यातील रसायन ओढ्यातील पाण्यात मिसळले. त्यामुळे हा ओढा वाहत असलेल्या रीसवाडी, रीस चांभार्ली, कांबा या गावांच्या हद्दीत अनेक मासे मृत्युमुखी पडल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. हा ओढा पुढे पाताळगंगा नदीला जाऊन मिळतो. त्यामुळे ओढ्याबरोबरच पाताळगंगा नदीतही हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले.
नदीत मृत मासे आढळल्याने एमआयडीसीने सुरक्षिततेचा उपाय म्हणून आज सकाळी मोहोपाडा आणि कैरे येथील जलशुद्धीकरण केंद्रांतून गावांना आणि कारखान्यांना होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला.
|