मुंबई - नाणार येथेच तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या मागणीसाठी कोकण विकास समितीतर्फे रत्नागिरी शहरात शनिवारी (ता. 20) मोर्चा काढण्यात येणार आहे. कोकणातील तरुणांना रोजगार मिळणार असल्याने हा प्रकल्प नाणारमध्येच उभारावा, अशी मागणी सोमवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत करण्यात आली.
शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपने नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द केला. त्यानंतर हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रायगडमधूनही काही प्रमाणात विरोध होण्यास सुरवात झाली असताना हा प्रकल्प पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमध्ये आणण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे.
प्रकल्पासाठी स्वेच्छेने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असल्याने हा प्रकल्प नाणार येथेच उभारावा, अशी मागणी कोकण विकास समितीने सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला पंढरीनाथ आंबेरकर, केशव भट, मुकुंद जोशी, अविनाश महाजन आदी उपस्थित होते. काही लोकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. आता प्रकल्पाच्या मागणीसाठी 20 जुलैला सकाळी 11.30 वाजता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कलपासून मोर्चा काढण्यात येईल, असे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
|