मुंबई - चौथ्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये "रायरंद'ला "विशेष एक्सलन्स पुरस्कार' मिळाल्यानंतर या चित्रपटाला हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या "इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल'मध्ये "स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन' पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटाचे खास स्क्रिनिंगही हैदराबाद येथील पंचतारांकित थिएटरमध्ये दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
या पुरस्काराबद्दल चित्रपटाचे पटकथाकार आशीष निनगुरकर म्हणाले, "या चित्रपटात आम्ही बालमजुरीसारखा गंभीर विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. "इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल'मध्ये चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याने आम्ही सगळे खूप खूश आहोत.'
न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज व सुभाष कृष्णा कदम निर्मित आणि रमेश पोपट ननावरे दिग्दर्शित या चित्रपटात बहुरूपींच्या जीवनावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. श्यामकुमार श्रीवास्तव यांनी "रायरंद'ची भूमिका साकारली आहे. त्यांच्या मुलाची प्रमुख भूमिका रणजित कांबळे यांनी, तर आनंद वाघ यांनी मुख्य खलनायकाची भूमिका केली आहे. भावेश लोंढे व आशीष निनगुरकर यांनी गीते लिहिली आहेत.
|