मुंबई - 1 मेपासून राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशभरातील मंत्र्यांना वाहनांवर लाल दिवा लावण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बंदी घातली आहे; मात्र मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राज्य सरकारचा आदेश येऊ द्या, मग माझ्या वाहनावरचा लाल दिवा काढतो, अशी भूमिका घेतल्याने वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय सर्वांनीच मान्य करायला हवा; मात्र त्यासाठी राज्य सरकारने आदेश काढला पाहिजे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या भाजप खासदारांना त्यांची संपत्ती जाहीर करण्याचे आवाहन केले होते; मात्र किती खासदारांनी संपत्ती जाहीर केली, असा सवाल करत महापौरांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे लाल दिव्याचा वाद आता रंगण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक पदांवरील राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव पदावरील अधिकाऱ्यांनीच लाल दिवा वापरण्याचे निर्देश दिले होते. त्या वेळच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी याविरोधात आपल्या वाहनावरील लाल दिवा काढण्यास नकार दिला होता. आता महापौर महाडेश्वर यांनीही सरकारी आदेशानंतरच लाल दिवा काढण्याची भूमिका घेतली आहे.
|