विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा 

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा 

मुंबई : विधी शाखेच्या गुणांकन पद्धतीवरून मुंबई विद्यापीठाला फैलावर घेत मुंबई विद्यापीठाच्या 60:40 गुणांकन पद्धतीला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच 100 गुणांची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तुघलकी निर्णयाने एका रात्रीत गुणांकन पद्धत बदलल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही का, असा सवालही न्यायालयाने विद्यापीठाला विचारला. 

विद्यापीठाने एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठी अचानक 60ः40 गुणांकन पद्धत सुरू करण्याचे परिपत्रक सर्व प्राचार्यांना पाठवले होते. त्यानुसार 40 टक्के गुण विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, अहवाल आणि हजेरीनुसार, तर 60 टक्के परीक्षेनुसार देण्यात येणार होते. याबाबत विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती. नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची या पद्धतीमुळे अडचण होणार होती. याबाबत दोन याचिकांसह एक जनहित याचिका न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर न्या. भूषण गवई आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. 

याचिकादारांचा गुणांकन पद्धतीला विरोध नाही; मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेल्या अभ्यासासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच विद्यापीठाने प्रथम त्यांच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षित करायला हवे. अन्यथा अशा पद्धतीमुळे मनमानी आणि गैरपद्धतीने गुणांकन होऊ शकते, असेही खंडपीठाने सुनावले. ऑनलाईन प्रवेश पद्धतीने आधीच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत गोंधळ झाला होता. तसेच याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या निर्णयाला अंतरिम स्थगिती देणे आवश्‍यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याचिकादारांच्या वतीने ऍड. उदय वारुंजीकर, ऍड. कानडे आणि विद्यापीठाच्या वतीने ऍड. रुई रॉड्रिग्ज यांनी बाजू मांडली. 

निर्णय घेण्याआधी अभ्यास करा! 
निर्णय घेण्याआधी सारासार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण देणे गरजेचे असते. मग विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेला निर्णय पुरेशा साधनांशिवाय एका रात्रीत कसे घेते, असा प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केला. विद्यापीठ नव्या पद्धतीचा विचार करत आहे, हे स्तुत्य आहे; मात्र रस्ता काही एका रात्रीत बांधून होत नाही. त्यामुळे विद्यापीठानेही एका रात्रीत निर्णय घेऊ नये. पुढील शैक्षणिक वर्षासाठी याबाबत विचार करावा, असेही खंडपीठाने सुचवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com