भावनांचा आदर करा; अन्यथा कायदे बदला

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई - लोकप्रतिनिधी एक होऊन महत्त्वाचा निर्णय घेतात, तेव्हा त्यांचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करावा; अन्यथा कायदे बदलून मुख्यमंत्र्यांनीच कारभार चालवावा, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मांडले. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्याचे आश्‍वासनही त्यांनी "मातोश्री' निवासस्थानी लोकप्रतिनिधींना दिले.

नवी मुंबई महापालिकेत आयुक्त मुंढे यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव मंजूर झाल्यानंतरही त्यांची बदली होणार नाही, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर महापौर सुधाकर सोनावणे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह सर्व पक्षांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले की, नवी मुंबईतील नागरिकांना आयुक्त त्रास देत आहेत. त्याविरोधात ही एकजूट आहे. लोकप्रतिनिधी अनुभवी आहेत. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ते काम करतात. पक्षभेद विसरून लोकांच्या हितासाठी नगरसेवक एकत्र आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांना बोलावून अविश्‍वासाच्या ठरावामागे काय कारण आहे, हे विचारले पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करा, नाहीतर कायदेच रद्द करा आणि मुख्यमंत्री म्हणतील तसा कारभार चालवा, अशी परखड टीका उद्धव यांनी केली.

या शिष्टमंडळासोबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारेही होते. आपण मुंढे यांच्या पाठीशी आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी कुठेही थेट म्हटलेले नाही. काही मर्यादा असतील म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी अविश्‍वास ठरावाला पाठिंबा दिला नाही. सरकार जनभावनेचा अनादर करील, असे वाटत नाही. आवश्‍यकता भासल्यास मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असे आश्‍वासन उद्धव यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com