अलिबाग : सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेला तो क्षण जवळ आला आहे. सरत्या वर्षा निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू असताना रायगड पोलिसांनी रात्रीच्या जमावबंदीसाठी जादा मनुष्यबळाची जमवाजमव केली आहे. त्यामुळे उत्साही पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. यामुळे पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांना पसंती न देता ग्रामीण भागातील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या मार्गांवरील चेकपोस्टवर वाहनांची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दोन दिवसांपूर्वीच पर्यटन व्यावसायिकांची बैठक घेऊन थर्टी फर्स्टचे आयोजन शांततेत करण्यासाठी आवाहन केले होते. यात त्यांनी आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले होते. यामुळे समुद्र किनाऱ्यावरील मोठ्या हॉटेल चालकांनी पर्यटकांना या संदर्भात आगाऊ सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली.
रात्री 11 ते सकाळी 6 या जमावबंदीच्या दरम्यान रस्त्यावर वर्दळ होणार नाही, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून सर्व पोलिस ठाण्यांना जादा कुमक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे दिवेआगर, किहीम या नेहमी पर्यटकांनी गजबजणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर आतापासूनच वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे. अलिबाग, वरसोली समुद्र किनाऱ्यांवरून पर्यटकांना काढता पाय घेतला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीची माहिती आठवड्यापूर्वीच देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द करावे लागले आहे. फटाके फोडण्यासही मज्जाव केल्याने नववर्षाचे स्वागत शांततेत करावे लागणार आहे.
Restrictions on Thirtyfirst enthusiasm in Alibag Notice issued to tourists
-------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.