पावसाने भातपिकावर रोगांचा मारा

पालघर : भात शेतीवर पसरलेला काजळी रोग.
पालघर : भात शेतीवर पसरलेला काजळी रोग.

पालघर (बातमीदार) : पालघर परिसरात मागील पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. रिपरिप पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम भाताच्या कणसावर होऊन त्यावर काजळी पडली आहे. यामुळे भाताचे दाणे काळे पडून ते भरलेले नाहीत, तर काही ठिकाणी भातावर खोड किड्याचा पादुर्भाव झाला आहे. पाऊस सुरूच असल्याने भाताची कापणी करता येत नसून शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. 

सातत्याने बदलणारे हवामान, निसर्गाचा लहरीपणा, बियाण्यांच्या वाढत्या किमती, मजुरांची कमतरता, वाढती महागाई यामुळे भातशेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली असताना पालघर जिल्ह्यात मात्र आजही प्रामुख्याने भातपिकाची मोठ्या संख्येने लागवड केली जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचा भातशेतीवरच उदरनिर्वाह चालतो. यंदाही त्यांनी मोठ्या आशेने भातलागवड केली. यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळिराजा आनंदात होता; मात्र त्याच्या आनंदावरच परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. 

नांदगाव आणि पश्‍चिम किनारपट्टीवरील पालघरच्या पूर्व भागात भातपिक कापणीला तयार झाले असतानाच सध्या रिपरिप पावसामुळे भातपिक आडवे झाले आहेत; तर भाताच्या कणसावर काजळी रोग पसरल्याने भाताचे दाणे काळे पडले आहेत. काही ठिकाणी खोडकिडा लागल्याने भाताची कणसे नष्ट झाली आहेत. त्यामुळे भाताचे उत्पन्न कमी होणार आहे. काही शेतकऱ्यांनी तर कापणीही केली होती, तेही भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारच्या कृषी विभागाने याची पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

यंदा पाऊस चांगला असल्याने भाताचे पीक चांगले आले होते; मात्र गेल्या पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असल्याने भातावर काजळी रोग आणि काही ठिकाणी खोडकिडा पसरलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाण्याची शक्‍यता आहे. उत्पादनावर परिणाम होणार असून उत्पादन घटणार आहे. 
- संदेश पाटील, शेतकरी 

पालघर तालुक्‍यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरूच असल्याने भातपिकावर काजळी रोग, तर काही ठिकाणी खोडकिड्याची लागण झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. भात तयार झाल्यामुळे यावर औषध उपचार करता येत नाही. भरपाईसाठी विमा कंपनीकडे दावा करावा लागेल. त्यासाठी कृषी विभाग सहकार्य करेल. शेतकऱ्यांनी संकरित बियाण्यांचा वापर न करता साध्या बियाण्यांचा वापर करावा. संघ संकरित बियाणे रोगाला बळी पडतात. 
- जगदीश पाटील, कृषी पर्यवेक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com