प्रवाशांच्या खिशावर रिक्षाचालकांचा डल्ला! 

प्रवाशांच्या खिशावर रिक्षाचालकांचा डल्ला! 

ठाणे - कल्याण येथील पत्री पुलाच्या तोडकामासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकचा फटका ठाण्याहून कल्याण, कर्जत, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि कल्याणहून ठाणे, अंबरनाथकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसला. रिक्षाचालकांनी काही ठिकाणी दुपटीहून जादा भाडे आकारून प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारला. लोकलच्या गर्दीत दरवाजात लटकून जीवघेणा प्रवास करण्यापेक्षा अनेकांनी जादा भाडे देत रिक्षाने प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे रिक्षाचालकांचे चांगलेच फावले होते. 

पत्री पुलाच्या तोडकामामुळे जलद मार्गावरील जवळपास सर्वच गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतुकीवर भार वाढला होता. यादरम्यान लोकलना प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांवर दारात लटकून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली. तसेच, मेगाब्लॉकबाबत अनभिज्ञ असलेल्यांची पुरती त्रेधातिरपीट उडाली होती. रेल्वेचा हा गोंधळ मात्र ठाणे आणि कल्याणमधील रिक्षाचालकांच्या पथ्यावर पडला. त्यांनी प्रवाशांची लुटमारच केली. सॅटिस पुलाखाली प्रवाशांच्या गैरसोईचा लाभ उठवत रिक्षाचालक कल्याणमध्ये जाण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून 300 रुपये भाडे आकारत होते. कल्याणमध्येही रिक्षाचालकांनी जादा भाडे आकारून प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारला. कल्याण स्थानक ते पत्री पुलापर्यंत एरवी प्रती सीट 12 ते 15 रुपये किंवा एकत्रित भाडे 40 रुपये आकारले जात असताना आज चक्क 100 रुपये प्रती सीट भाडे आकारण्यात आले. कल्याण ते ठाण्यापर्यंत 350 रुपयांऐवजी 400 रुपये, तर कल्याण ते अंबरनाथपर्यंतच्या प्रवासासाठी प्रती सीट 150 ऐवजी 250 ते 400 रुपयांपर्यंत भाडे आकारले जात होते. 

पत्री पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर सीएसएमटीहून डोंबिवली आणि कल्याण ते कसारा-कर्जत अशा लोकल सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. यादरम्यान ठाण्याहून कल्याणच्या पुढे जाणाऱ्यांना मनस्ताप झाला. सीएसएमटीहून लोकल खचाखच भरून आल्याने अनेकांना गाडीत चढताच येत नव्हते. याचा सर्वांत जास्त फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला. ठाण्याहून शहाडला निघालेल्या ललिता देशमुख यांना गाड्या का बंद आहेत, याची माहितीच नव्हती. "मला मुंबईत काही कामानिमित्ताने जायचे होते; मात्र गर्दीमुळे लोकलमध्ये चढताच आले नाही', असे ठाण्यातील पंकज पाण्डेय यांनी सांगितले. 

वाढीव रिक्षा भाडे घेऊ नका, प्रवाशांची लूट न करता त्यांना मदत करा, असे आवाहन करूनही काही रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून जादा भाडे घेतले, हे दुर्दैवी आहे. अशा रिक्षाचालकांमुळे प्रामाणिक रिक्षाचालक बदनाम होत आहेत. 
- प्रकाश पेणकर, अध्यक्ष  रिक्षा चालक-मालक असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com