मुंबई - शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यानुसार शालेय प्रवेशाच्या पहिल्या सोडतीमधील तब्बल 21 हजार जागा रिक्त राहिल्यानंतर दुसऱ्या सोडतीची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. उन्हाळी सुटीमुळे ही सोडत पुढे ढकलण्याची मागणी पालकांनी केली होती. त्यातच सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे शिक्षण विभागाने ही सोडत पुढे ढकलली आहे.
आरटीई कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शाळांमधील 25 टक्के प्रवेशांची सोडत 8 एप्रिलला काढण्यात आली. त्यात राज्यातून निवड झालेल्या 67 हजार 706 पैकी 46 हजार 842 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. मुंबईतून निवड झालेल्या 3532 पैकी 2259 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 65 विद्यार्थ्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले असून, 1207 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही.
पालकांनी प्रवेश न घेतलेल्या जागा दुसऱ्या सोडतीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. दुसरी सोडत 20 आणि 21 मे रोजी काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे सोडत लांबणीवर पडली आहे. उन्हाळी सुटी असल्यामुळे सोडत पुढे ढकलण्याची विनंती पालकांनी केली होती. या सोडतीची सुधारित तारीख अद्याप शिक्षण विभागाने जाहीर केलेली नाही.
|