ठाण्यातील खारफुटी नष्ट होण्याच्या मार्गावर 

खाडीकिनारी साचलेला कचरा
खाडीकिनारी साचलेला कचरा

कळवा : ठाणे शहराजवळील कळवा, विटावा व खारीगाव खाडीकिनारी खारफुटीची झुडपे तोडून बेकायदा चाळींचे गेल्या काही वर्षात पेव फुटले आहे. ही समस्या असतानाच आता विटावा गणेशविसर्जन घाट, खाडी किनाऱ्यावरील खारफुटीच्या जागेवर गेल्या काही दिवसांपासून कचरा व डेब्रिज टाकले जात असल्याने येथील खारफुटीचे जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच येथील जीवसृष्टीही धोक्‍यात आली असून, पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

विटावा खाडी किनारी दोन दशकापूर्वी मोठ्या प्रमाणावर हिरव्यागार खारफुटीचे जंगल होते. खाडीत वेगवेगळ्या प्रकारचे सागरी जीव, मासे, तसेच खारफुटीच्या चिखलात खेकडे, खाडीकिनारी अनेक दुर्मिळ वनस्पती आढळत होत्या. खाडीकिनाऱ्यावरील हिरव्यागार वनश्रीच्या सौंदर्याने कळवा परिसरातील नागरिकांना भुरळ घातली होती. सकाळ-संध्याकाळ येथील नागरिक तेथे फेरफटका मारण्यासाठी येत असत.

परंतु गेल्या काही दिवसात येथील भूमाफियांनी या खाडीकिनाऱ्यावर अतिक्रमण करून तिवरांची कत्तल करून तेथे चाळी उभारल्या. उरलेल्या खाडीच्या किनाऱ्यावर सध्या भूमाफियांकडून डेब्रिज, परिसरातील रहिवाशांकडून कचरा व प्लास्टिक पिशव्या व इतर भंगारातील वस्तू फेकल्या जात असल्याने खाडी किनारी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. 

विटावा खाडीकिनारी बेकायदा झोपड्यांची वस्ती नव्हती तेव्हा स्थानिक मच्छिमार आपल्या छोट्या होड्या घेऊन जाळे टाकून मासेमारी करीत होते. मात्र खाडीकिनारी भराव करून बेकायदा बांधकामांमुळे खाडीकिनारा अरुंद झाला आहे. तसेच येथे वस्ती वाढल्याने तयार होणारा कचरा येथील नागरिक कचराकुंडीत न टाकता खाडीत फेकून देत असल्याने हे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे.

त्यामुळे मासेही दुर्मिळ झाले आहेत. घराजवळ हक्काचा खाडीकिनारा असूनही या स्थानिक कोळी बांधवांना मुंबई व भाईंदर येथून समुद्राचे मासे विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खाडी किनारी असलेले कचऱ्याचे साम्राज्य हटवून किनारा सुशोभित करावा, येथील भूमाफिया, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांमधून केली जात आहे. 

खाडी किनारी कचरा, डेब्रिजचे साम्राज्य असून, विटावा विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना कचरा हटवण्याबाबत त्वरित सूचना देण्यात येतील. - मयुरी अंबाजी, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, 

खाडीकिनारी कचरा टाकणे अयोग्यच आहे. या परिसराची तात्काळ पाहणी करून कचरा उचलण्यासाठी, तसेच कारवाईसाठी पाठपुरावा करू. 
-प्रियांका पाटील, 
स्थानिक नगरसेविका,विटावा 

सध्या खाडीकिनाऱ्यावर विविध प्रकारचा कचरा फेकला जो. त्यामुळे खाडीचे पाणी दूषित होऊन मासे व खेकड्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मासेमारी व्यवसायही धोक्‍यात आला आहे. 
-जयेश कोळी, 
स्थानिक रहिवासी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com