मुंबई - शाळांवरील वाढता ताण आणि मुलांच्या मनावरील वाढते दडपण लक्षात घेऊन शाळा आठवड्याला सहा दिवसांऐवजी पाच दिवस चालवाव्यात, अशी मागणी शिक्षण परिषदेचे मुंबई विभागप्रमुख अनिल बोरनारे यांनी केली.
बाल्यावस्था लक्षात घेऊन हा निर्णय सरकार पातळीवर घेतला जावा असे बोरनारे म्हणाले. बोरनारे यांनी माहिती अधिकाराचा वापर करून याबाबत सरकारी पातळीवर सुरू असलेल्या हालचाली जाणून घेतल्या. त्यांनी 25 एप्रिलला सामान्य प्रशासन विभागाकडे याबाबत उत्तर मागितले. या विभागाने शालेय शिक्षण विभागाचा अभिप्राय मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचे माहिती अधिकारातून समजले. आधीच शाळांतील दैनंदिन तासिका नऊऐवजी आठ तासांवर आल्या आहेत. प्रत्येक अर्ध्या तासाची तासिका पाच मिनिटांनी वाढली आहे. त्यामुळे शाळा आठवड्याला पाच दिवसच चालवणे शक्य होणार आहे.
काही शाळांनी पाच दिवसांचा आठवडा सुरू केल्याचेही बोरनारे यांनी सांगितले. हा प्रयोग अमलात आणल्यास हरवलेले बालपण विद्यार्थ्यांना पुन्हा मिळेल असे ते म्हणाले.
|