उल्हासनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई आशान

उल्हासनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई आशान

उल्हासनगर  : उल्हासनगर महापालिकेची स्थापना 1996 मध्ये झाल्यापासून 2017 मध्ये प्रथमच महापौरपद भाजपला मिळाले; मात्र विधानसभेला भाजपने उमेदवारी नाकारल्याचा राग मनात धरून ओमी कलानी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने, भाजपला अवघ्या अडीच वर्षांतच महापौर पदावरून पायउतार करावा लागला आहे. शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांची 43 मते मिळवून महापौरपदी; तर रिपाइंचे भगवान भालेराव उपमहापौरपदी निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी करताच, महापालिकेच्या बाहेर शिवसैनिक, ओमी कलानी समर्थक, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

पालिकेवर 2017 च्या निवडणुकीनंतर भाजप, टीम ओमी कलानी आणि साई पक्ष (सेक्‍युलर अलायंस ऑफ इंडिया) या आघाडीची सत्ता होती. या आघाडीकडे 44 संख्याबळ होते; तर शिवसेनेकडे 25, राष्ट्रवादी 4, रिपाइं 4 व कॉंग्रेस 1 असे एकूण 34 जागा होत्या. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी किमान 40 असा मॅजिक फिगर शिवसेनेला हवा होता. दरम्यान, ओमी कलानी यांना भाजपने विधानसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याचा वचपा काढण्यासाठी ओमी यांनी शिवसेनेसोबत हातमिळवणी केली.

ओमी कलानीच्या 10 नगरसेवकासोबत त्यांची पत्नी पंचम कलानी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. यानंतर आज सभागृहात हात उंचावून करण्यात आलेल्या महापौरासाठीच्या मतदानात शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना 43; तर साई पक्षाचे जीवन इदनानी यांना 35 मते मिळाली. उपमहापौरमध्ये शिवसेना आणि टीम ओमी कलानीसोबत असलेले रिपाइं आठवले गटाचे भगवान भालेराव यांना 44 व भाजपचे विजय पाटील यांना 34 मते मिळाली आणि शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांची महापौरपदी; तर रिपाइंचे भगवान भालेराव यांची उपमहापौरपदी निवड झाली. 

भाजपच्या नादी लागणारा साई पक्षही सत्तापार

पप्पू कलानीच्या एकाधिकारशाहीला कंटाळून 2007 पासून विभक्त झालेल्या एका गटाने साई पक्षाची (सेक्‍युलर अलायंस ऑफ इंडिया) निर्मिती करून 2007, 2012, 2017 मध्ये सलग उल्हासनगर महापालिकेत सत्तेचा वाटा घेतला. सन 2007 आणि 2012 मध्ये साई पक्ष शिवसेनेसोबत असताना त्यांना महापौर, स्थायी समिती सभापतिपदाचा मान मिळाला होता; मात्र 2017 च्या पालिका निवडणुकीनंतर साई पक्षाने भाजपसोबत युती केली. टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांच्या बळावर 1996 नंतर प्रथमच भाजपच्या महापौर म्हणून मीना आयलानी यांना मान मिळाला; तर साई पक्षाचे जीवन इदनानी उपमहापौर झाले; पण अडीच वर्षांनंतर महापौरपद मिळणार, अशा साईला दिलेल्या आश्वासनाला भाजपने नकार दिल्याने साई पक्षानेदेखील महापौराच्या रिंगणात उडी घेतली. त्यामुळे फूट पडण्याचे चित्र दिसू लागताच, साई पक्षाचे भाजपात विलीनीकरणाची आणि महापौरपदावर निवडून आणण्याची खेळी खेळण्यात आली. साई पक्षाचे उमेदवार असल्याने जीवन हे एका नगरसेवकासोबत साई पक्षात राहिले; मात्र त्यांनी 10 नगरसेवकांना भाजपच्या दावणीला बांधले. महापौरांच्या निवडणुकीत जीवन इदनानी यांचा एकीकडे दारुण पराभव झाला असतानाच 2007 पासून सत्तेत असलेला साई पक्षही त्यामुळे सत्तापार झाला आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com