शिवडी - महाराष्ट्र समजून घेताना सातारा जिल्ह्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. साताऱ्याच्या भूमीने देशाला आणि महाराष्ट्राला शौर्यवान अशी रत्ने दिली आहेत, असे गौरवोद्गार खासदार संजय राऊत यांनी काढले. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी (ता. 28) साताररत्न भूषण पुरस्कार वितरण आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम परळ येथील दामोदर सभागृहात झाला. त्या वेळी ते बोलत होते.
साताऱ्याच्या भूमीने यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते आदी रत्ने महाराष्ट्राला दिली. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वात जास्त बलिदानही सातारकरांचे आहे. एक प्रकारे महाराष्ट्रावर सातारकरांचे ऋण असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले. बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांना कामगाररत्न, रोहन भोसले यांना क्रीडारत्न, सूर्यकांत कदम यांना साहित्यरत्न, पुष्करणी सुभेदार यांना शिक्षणरत्न, विजय कासुर्डे यांना समाजरत्न, संतोष मोरे यांना उद्योगरत्न, अशोक शिंदे यांना पत्रकारितारत्न, प्रेरणा जावळे यांना वैद्यकीय रत्न, मानसिंग पवार यांना कलारत्न, सुधीर कांबळे यांना कायदारत्न, मदन गोसावी यांना प्रशासकीय रत्न, नंदकुमार काटकर यांना सहकाररत्न, हरीश भांदिर्गे यांना राजकीय रत्न या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सातारा भूषण पुरस्काराचे मानकरी म्हणून मोहन चव्हाण, उमेश माने, ऍड. वर्षा देशपांडे, विशेष उल्लेखनीय पुरस्काराने नवनाथ सकुंडे यांना गौरविण्यात आले.
|