मुंबई - महापालिकेत पाच वर्षे शिवसेना - भाजपचा संघर्ष पेटत राहण्याची शक्यता आहे. त्याची सुरवात महापालिकेच्या अर्थसंकल्पावरून झाली आहे. महापौरांनी अर्थसंकल्प आकडे फुगवून मांडू नये. तो वास्तवदर्शी मांडावा, अशी मागणी महापौरांनी केली. त्यानंतर भाजपने करवाढीची शिफारस न करण्याची मागणी केली आहे.
पालिकेचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना त्यात प्रकल्पांसाठी अनावश्यक तरतुदी न करता गरज असेल, तेवढीच तरतूद करावी. त्यामुळे आर्थिक शिस्त येईल, असा वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडावा, अशी मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठवून केली आहे. महापालिकेचा अर्थसंकल्पातील निम्मा निधी खर्च होत नाही. त्यावरून विरोधक नेहमीच लक्ष्य करतात. त्यामुळे शिवसेनेने ही सेफ खेळी खेळली. यंदा वस्तू व सेवा करामुळे करवाढ करण्याची शिफारस प्रशासनाकडून अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. ही करवाढ रद्द करण्यासाठी भाजपने आतापासूनच हातपाय मारण्यास सुरवात केली आहे. मुंबईतील नागरिकांवर करवाढ करू नका, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे. तसेच अर्थसंकल्प फुगवून दाखवू नये, अशीही मागणी त्यांनी केली आहे. पुढील पाच वर्षे शिवसेना-भाजपमध्ये श्रेयाची लढाई रंगणार आहे. त्याची सुरवात या अर्थसंकल्पापासून झाली असून येत्या काळात ती वाढत राहण्याची शक्यता आहे.
|