माथाडी कामगारांचे प्रश्‍न सोडवणार!

वाशी येथे आयोजित माथाडी कामगार मेळावा.
वाशी येथे आयोजित माथाडी कामगार मेळावा.

नवी मुंबई : आम्ही कधीही माथाडी कामगार चळवळीच्या बळकटीला नख लावण्याचे काम करणार नाही, आमची पूर्ण ताकद या चळवळीच्या पाठीशी असेल. शिवसेना कधीही या चळवळीला आडकाठी घालण्याचे काम करणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. वाशी बाजार समितीत गुरुवारी (ता.२५) माथाडी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची माती ही देशाला दिशा देण्याचे काम करते. माथाडी हा ताठ मानेने जगला पाहिजे, यासाठी आम्ही कामगारांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्‍वासनही ठाकरे यांनी दिले. 

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त आणि माथाडी कायदा व माथाडी पतपेढीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अण्णासाहेब यांचे ऋणानुबंध, सातारा लोकसभा निवडणुकीतील व माथाडी कायद्याच्या कटू आठवणींना उजाळा दिला. कामगारांच्या विकासावर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा आलेख पाहिला जातो. बाळासाहेबांच्या प्रयत्नातूनच आज अण्णासाहेबांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ उभे असल्याचे सांगून पाटील यांनी या महामंडळाचे शिवसेनेला श्रेय दिले. 

नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरकुलासाठी वाढीव चटई क्षेत्र व तोलाई कामगारांना बाजार समितीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, या मागण्या केल्या. माथाडी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांवर आणि भवितव्यावर सडेतोड विचार मांडले. शिंदे म्हणाले, अण्णासाहेबांची ही चळवळ मोठ्या संघर्षातून उभी राहिली.या चळवळीला कोणाचीही दृष्ट लागू नये हे आणि त्यात फूट पडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी किमान वेतन आणि हक्काचे घरकुल मिळण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असेल, असे आश्‍वासन या वेळी दिले. याप्रसंगी युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, खासदार राजन विचारे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, प्रसाद लाड, प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, संदीप नाईक, भाजप नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते. 

विकास महामंडळाच्या माध्यमातून युवकांना ४०० कोटींचे कर्ज 
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये दौरे करून तब्बल ४०० कोटींचे कर्ज युवकांना देऊ शकलो. हे सर्व माथाडी कायद्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेल्या विश्‍वासामुळे करता आले, असा विश्‍वास माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com