भुकेल्यांसाठी तो बनलाय देवदूत; सुरु केलंय 'रोटी घर'...

भुकेल्यांसाठी तो बनलाय देवदूत; सुरु केलंय 'रोटी घर'...
भुकेल्यांसाठी तो बनलाय देवदूत; सुरु केलंय 'रोटी घर'...

मुंबई : देशभरातील लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांसमोर रोजी-रोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्थलांतरित कामगारांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा लोकांच्या मदतीला चिनू क्वात्रा नामक व्यक्ती देवदूत बनून आली आहे. त्यांनी आपल्या "रोटी घर'च्या माध्यमातून दररोज गरजू लोकांच्या मुखी घास भरवण्यास सुरुवात केली आहे. 

देशभरात कोरोना संसर्ग वाढल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे मात्र हाल सुरू झाले. दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींसह नाका कामगार, स्थलांतरित कामगार, सुरक्षा रक्षक, असंघटित कामगार यांच्या जेवणाची भ्रांत सुरू झाली. मुंबईतील बेघर अन्नासाठी वणवण भटकायला लागले आहेत. अशा बेघर लोकांना "रोटी घर'ने मोठा आधार दिला असून त्यांच्यासाठी मोफत अन्न पुरवठा सुरू केला आहे; तर इतरांसाठी केवळ 25 रुपयांत जेवण दिले जात आहे.

"रोटी घर'चे ठाण्यात स्वतःचे किचन आहे. या किचनमध्ये दोन स्वयंपाकी आणि क्वात्रा यांची आई जेवण बनवण्याचे काम करते. डाळ, भात आणि लोणचे असा "रोटी बॅंके'चा मेन्यू आहे. त्याशिवाय क्वात्रा यांच्याकडे 15 जणांची टीम आहे. ही टीम या कामात मोलाची मदत करते. क्वात्रा यांची स्वतःची दोन वाहने आहेत. या वाहनांतून जेवणाचे डबे गरजूंपर्यंत पोचवले जातात. सध्या मुंबईसह, ठाणे आणि नवी मुंबईतील गरजूंना अन्नपुरवठा केला जातो. 

देशभरातील लॉकडाऊनमुळे सर्व भुकेल्यांना अन्न पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मदत केली. लोकांसाठी "रोटी घर'ने हेल्पलाईन नंबर सुरू केले असून त्यावर आलेल्या कॉलनुसार त्यांना त्यांच्या जागेवर अन्न पुरवतो. गरजूंनी 9699396544, 9619089050, 9987730605, 7506384025, 9594609229, 7208773650 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन "रोटी घर'च्या वतीने करण्यात आले. 

लॉकडाऊनमुळे ज्या गरजूंना अन्न मिळणे शक्‍य नाही, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. त्यांना आम्ही विनामूल्य घरपोच अन्नसेवा देऊ. जितक्‍या लोकांना गरज असेल त्यांना अन्न पुरवण्याचा आमचा मानस आहे. 
- चिनु क्वात्रा, प्रमुख, रोटी घर. 

लॉकडाऊनमुळे मुंबई, ठाण्यातील स्थलांतरित कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहील. संकटकाळात कोणीही उपाशी राहू नये यासाठीचा हा प्रयत्न आहे. 
- प्रियांका चतुर्वेदी, खासदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com