सर्व तलावांत आठ महिने पुरेल इतका साठा
मुंबई - मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी तुळशी तलावानंतर तानसा तलाव गुरुवारी (ता. 25) तुडुंब झाल्याने मुंबईकरांचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार आहे. मुंबई आणि तलाव क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने तलावांची पाणीपातळी कमालीची वाढली आहे. सातही तलावांत एकूण आठ लाख 37 हजार 395 दशलक्ष लिटर पाण्याचा साठा झाला असून, मुंबईकरांची आठ महिन्यांची तहान त्यामुळे भागणार आहे.
मुंबई शहर, उपनगरांसह तलाव क्षेत्रांतही जोरदार पाऊस सुरू असल्याने तलावांतील पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा तलावांतून दररोज 3900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या या तलावांत एकूण आठ लाख 37 हजार 395 दशलक्ष लिटर पाण्याचा साठा झाला आहे. त्यात तुळशी 12 जुलैपासून; तर तानसा तलाव गुरुवारी दुपारपासून ओसंडून वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित तलावही लवकरच तुडुंब होतील, असा अंदाज जलविभागाने व्यक्त केला आहे.
|