पावसाचा जोर; जीवाला घोर

पावसाचा जोर; जीवाला घोर

ठाणे - ठाणे जिल्ह्यामध्ये कोसळणाऱ्या संततधारेमुळे शहरांतील सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांमध्ये पावसाच्या सरी कायम असल्यामुळे या भागामध्ये पुढील तासांत मोठ्या पावसाची शक्‍यता प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबईने व्यक्त केली आहे. मंगळवारी दिवसभरात ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण १ हजार ४३२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद भिवंडीत झाली असून, तेथे १२५ मिमी पाऊस पडला, तर त्याखालोखाल ठाणे शहरात ११७ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील नद्या दुथडी वाहत असून, काठावरील गावांना धोक्‍याचा इशारा देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठाणे शहरामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे घोडबंदर परिसरामध्ये पाणी साचून रस्ता तुडुंब भरून गेला होता. याचा फटका रस्ते वाहतुकीला होत होता. दिवा, मुंब्रा आणि कळवा भागात सखल भागातील घरामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळित झाले होते.

पाणीसाठा वाढला...
धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दीड महिन्यामध्ये धरणे भरण्यास सुरुवात झाली असून, मोडकसागर धरण भरले असून मंगळवारी तानसा धरणही भरून वाहू लागले आहे. भातसा धरणामध्ये ७१.५४ टक्के पाणी असून, आंध्रा धरण ५०.६३ टक्के भरले आहे. बारवी धरणाचा पाणीसाठा ८० टक्‍क्‍यांच्या पुढे गेला असून, या आठवड्यामध्ये ही सगळी धरणे भरून जाण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. उल्हास नदीवरील बदलापूर बंधाऱ्याची पातळी १४.३० असून, धोक्‍याची पातळी १७ असून ही गाठण्याची शक्‍यता व्यक्त होत होती; तर मोहने बंधारा ७.३० असून १० ही येथील धोक्‍याची पातळी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com