आंध्रा धरणातील पाणी साठा वाढला

आंध्रा धरणातील पाणी साठा वाढला

ठाणे - ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण भरल्यानंतरही आंध्रा धरणातील पाणीसाठा कमी असल्याने जिल्ह्यावर पाणी संकट कायम होते; मात्र श्रावणाच्या अखेरीस पुणे जिल्ह्यातही दमदार पाऊस झाल्याने आंध्रा धरणातील पाण्यात वाढ झाली असून, पाणीसाठा ८२.५६ टक्के झाला आहे. पावसाने जोर कायम ठेवल्यास ऑगस्ट महिन्याअखेरीस आंध्रा धरणही १०० टक्के भरेल, असा विश्‍वास लघु पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने जूनमध्येच दमदार आगमन केले होते. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्र परिसरातही पाऊस चांगला झाल्याने जुलैअखेरीस बारवी आणि मोडकसागर धरण १०० टक्के भरले. त्या पाठोपाठ तानसा आणि भातसा धरणही भरले; मात्र आंध्रा धरणातील पाणीसाठा हा चिंताजनकच होता. जुलैअखेरीस आंध्रा धरणात केवळ ६९.६० टक्के पाणीसाठा असल्याने पाणी टंचाईचा प्रश्‍न निर्माण होण्याची शंका लघु पाटबंधारे विभागाने व्यक्त केली होती; परंतु श्रावण महिन्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, पाणीसाठा वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील आंध्रा धरणातूनही ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३३९ दलघमी इतकी आहे. पावसाच्या दमदार सरींमुळे धरणाचा पाणीसाठा २८० दलघमी इतका वाढला असून, साठ्यात १५ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com