ठाणे - ठाणे महापालिकेच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती मिळणार आहे. केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी (ता. 12) प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. यानंतर या प्रकल्पाबाबत पालिकेने तीन आठवड्यांत केंद्र सरकारसोबत करार करावा, अशी सूचना गडकरी यांनी महापालिका आयुक्तांना दिली. बैठकीला खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अंतर्गत जलवाहतूक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात ठाणे-वसई-कल्याण, ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भातील तपशीलवार प्रकल्प अहवाल तज्ज्ञ सल्लागार मे. मेडुला सॉफ्ट टेक्नॉलॉजीज या कंपनीद्वारे तयार करण्यात आला आहे. त्या संदर्भातील सादरीकरण जयस्वाल यांनी वाहतूक भवनात केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सादर केले. या प्रकल्पाच्या प्रगतीविषयी गडकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ठाणे महापालिकेने तीन आठवड्यांत केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प विभागाशी सामंजस्य करार करावा. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीचे वितरण करणे सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी गडकरी यांनी आयआयटी, चेन्नई, जेएनपीटी, बीपीटी आणि कोचिन शीपयार्ड या संस्थांशीही समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वसई-ठाणे-कल्याण या मार्गावर वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकार देणार आहे. या प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या बोटीमध्ये सीएनजी आणि मिथेनॉल हे प्रदूषणविरहित इंधन वापरले जाणार आहे.
प्रकल्प परिसरातच दुरुस्ती केंद्र
या प्रकल्पासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तंत्रज्ञान पुरवण्यात येईल, असे आश्वासन गडकरी यांनी महापालिकेला दिले. या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी आणि निगा व देखभालीसाठी प्रकल्प परिसरातच अत्याधुनिक केंद्र उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील नागरिकांना कमी वेळात प्रदूषणविरहित जागतिक दर्जाची सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
|