'ठाणे अनलॉक'वरून कलगीतुरा; एकनाथ शिंदेंवर भाजपचा निशाणा, शिवसेनेकडूनही चोख प्रत्युत्तर!

'ठाणे अनलॉक'वरून कलगीतुरा; एकनाथ शिंदेंवर भाजपचा निशाणा, शिवसेनेकडूनही चोख प्रत्युत्तर!

ठाणे : एकीकडे कोरोनाच्या आपत्तीत राजकारण नको म्हणायचे अन्‌ श्रेय घेण्यासाठी आटापिटा करत विरोधकांना डावलायचे, अशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची दुटप्पी भूमिका असल्याची खरमरीत टीका ठाण्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांनी केली; तर एखादी गोष्ट चुकीची झाली तर सत्ताधाऱ्यांवर खापर फोडायचे आणि चांगली झाली तर श्रेयवादासाठी आटापिटा करायचा, अशी भाजपची दुटप्पी भूमिका झाल्याची टीका महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. त्यामुळे "ठाणे अनलॉकवरून' शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. 

ठाणे शहरातील दुकाने उघडण्याचा निर्णय गुरुवारी (ता. 13) दुपारी घेण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला भाजपचे आमदार वा प्रतिनिधींना बोलावण्यात आले नव्हते; तर शिवसेनेकडून दुकाने खुली करण्याबाबतचे श्रेय लाटले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार केळकर व डावखरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबईत 5 ऑगस्टनंतर सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय झाला; मात्र ठाण्यात दुकानांवर निर्बंध होते. यासंदर्भात सर्वप्रथम भाजपने आर्थिक विवंचनेतून जात असलेल्या व्यापाऱ्यांची अडचण जाणून आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना निवेदन दिल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. 

त्या वेळी अधिकृत भूमिका घेणारा भाजप हा एकमेव पक्ष होता; मात्र सत्ताधारी शिवसेनेचे नेते तेव्हा गप्प होते. काल झालेल्या बैठकीनंतर दुकाने उघडण्याचे श्रेय घेण्यासाठी अहमहमिका लागली. कोरोनाच्या काळात राजकारण नको म्हणताना विरोधकांना विश्‍वासात न घेताच परस्पर बैठका घेण्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करीत आहोत, असे आमदार केळकर व आमदार डावखरे यांनी सांगितले.

त्यावर भाजपने श्रेय मिळवण्यासारखे काम करावे आणि ठाण्यातील जनतेच्या विश्‍वासास पात्र ठरावे. फक्त पत्रक देऊन काम होत नाही, अशी प्रतिक्रिया महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. 

ठाणेकरांनी आम्हाला पालिकेत एकहाती सत्ता दिली. म्हणून शहरातील हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचा आमचा अधिकार आहे. व्यापारी प्रतिनिधींनी आमच्यापुढे त्यांची कैफियत मांडली असून, यातून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच टाळेबंदीसाठी भाजप आम्हाला दोष देत होते, पण टाळेबंदी आणि पालिकेने घेतलेल्या काळजीमुळे रुग्णसंख्या कमी झाली आहे त्याचे श्रेय आम्हाला का देत नाहीत? 
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे 

-----------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com